- यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत बैठक
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा
- संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी
मुंबई, दि. १८: यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल नसलेल्या नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी कार्यवाही करा, भूमिहीन गरीब कुटुंबांना गावठाणामधील जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, आमदार राजू तोडसाम, आमदार आमश्या पाडवी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल व यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्ह्यात शासनाने 68 हजार घरकुलाना मंजुरी दिली आहे. गावठाणच्या जागेवर वर्षानुवर्ष भूमिहीन कुटुंब राहत आहेत. या पात्र कुटुंबांना घरकुल उपलब्ध व्हावे, यासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
मंत्री गोरे म्हणाले, गावठाणच्या जागेवर अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांच्या घरकुलाची जागा नियमाकूल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा.
बैठकीत जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत अंतर्गत पांदण रस्ते, विविध गावांमध्ये रस्त्याची कामे, यासह त्रिशंकू स्थिती असलेल्या पुनर्वासित गावाबाबत चर्चा करण्यात आली. जवळपास 31 गावांमधील ग्रामपंचायत वार्ड निर्मिती, संबंधित ग्रामपंचायतीमधील समावेश आदीबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जामवाडी, दर्यापूर, शिवनी सह विविध गावांच्या बाबत चर्चा करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या उभारणीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी (नायगाव, जि.सातारा) येथील स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून स्मारकाच्या उभारणीचे नियोजन व खर्चाचे आराखडे लवकरात लवकर सादर करावेत, अशा सूचना मंत्री गोरे यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, अधीक्षक अभियंता डी. पी. माने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
संत शिरोमणी सावता माळी तीर्थक्षेत्रच्या कामांना गती द्यावी
संत शिरोमणी सावता माळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातील अरण गावात शासनाने तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा दिला आहे. येथील समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी भूमी अधिग्रहण, मंदिर, भोवतालचे संरक्षक भिंत यांसह विविध विकासकामे केली जाणार आहेत. यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून संबंधित प्रस्ताव पाठवण्यात यावे व आराखड्यास अंतिम करण्यासाठी कामास गती द्यावी, असे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले.
यावेळी प्रधान सचिव एकनाथ डवले, मंदिर संस्थानचे प्रमुख सावता महाराज वसईकर, प्रभू महाराज उपस्थित होते. तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कार्यकारी अभियंता अजय भोसले, वास्तुशास्त्र विशारद हेमंत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
०००
किरण वाघ/विसंअ/