बीड, दि. ०७ (जिमाका): बीड शहरात सुरू असलेली विविध विकास कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार काम करावी. बीडकरांच्या स्मरणात राहील तसेच शहराच्या वैभवात भर घालणारी कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी आज सकाळी बीड शहरातील चंपावती क्रीडा मंडळ, कनकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालय, येथे सुरू असलेल्या व नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांची पाहणी केली. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.
कंकालेश्वर मंदिर येथे पाहणी करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली. कंकालेश्वर देवस्थान हे बीड शहरासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कनकालेश्वर देवस्थान परिसरात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारंपरिक व आधुनिकतेचा संगम साधत बीडकरांना कायम स्मरणात राहील असे दर्जेदार कामे करावीत. विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे. भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळतील अशा सर्व बाबींचा आराखड्यामध्ये समावेश करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी कनकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले.
जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करून उपस्थित नागरिकांशी उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला. जिल्हा क्रीडा संकुलासाठी 2499.96 लक्ष किंमतीच्या अंदाजपत्रकात विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. क्रीडा संकुलाच्या कामामुळे बीडकरांना सुसज्ज क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, क्रीडा संकुलालगतचा संपूर्ण परिसर स्वच्छ करावा, या परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही याबाबत नगरपालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेल्या कामाचीही उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. इमारतीची कामे करताना आगामी 50 वर्षांचा सर्वांगीण विचार केला पाहिजे, वीज, वाहनतळ, अग्निशामन यंत्रणा, सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे, इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे असे काम करा, असेही ते म्हणाले.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००