शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, इंदूर ते छत्रपती संभाजीनगर (एल-७५३) राष्ट्रीय महामार्गाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा मार्ग काहीसा वळणाचा असून त्यामध्ये दिशा (अलाइनमेंट) बदल केल्यास संपूर्ण रस्त्याचे अंतर कमी होऊ शकते तसेच खर्चातही बचत होईल.

बैठकीत मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासंदर्भातील दर, त्यावरील प्रलंबित तक्रारी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांच्या हितासाठी सकारात्मक विचार केला जाणार असून, दिशा बदलण्याचा प्रस्ताव महाधिवक्ता यांच्याकडे सादर करण्यात येईल, असे श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून, योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले मुद्दे मांडले.

oooo

राजू धोत्रे/विसंअ/