आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण : अल्पबचत भवनमध्ये विशेष प्रदर्शनाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

प्राचीन काळापासून आज पर्यंतचा देशाचा राजकीय प्रवास समोर ठेवणारे प्रदर्शन

जळगाव, दि. २५ जून (जिमाका वृत्तसेवा):- भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक टप्पा असलेल्या आणीबाणीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पबचत भवन, जळगाव येथे “आणीबाणी @५०” हे विशेष माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज उत्साहात पार पडले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि त्यावरील मांडणीचे कौतुक केले.

प्राचीन ते वर्तमान लोकशाहीचा प्रवास

या विशेष प्रदर्शनात भारतातील प्राचीन लोकशाही संकल्पनांपासून ते १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीपर्यंतचा व त्यानंतरचा प्रवास माहिती फलकांच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे. महाजनपद काळातील लोकसहभाग, बुद्धकालीन राजनीती, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य, महात्मा बसवेश्वर यांचा अनुभव मंडप, ईशान्य भारतातील स्वशासन, भारताचे स्वातंत्र्य, संविधान, प्रजासत्ताक भारत आणि त्यानंतरची आणीबाणीतील राजकीय-समाजपरिवर्तन घडामोडी याचे यथार्थ दर्शन या माध्यमातून घडवण्यात आले आहे.

प्रदर्शनामध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर देशात आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात जे बदल घडले, त्या काळात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या आठवणी, दस्तऐवज, छायाचित्रे, वर्तमानपत्र कात्रणे, तसेच आणीबाणीत सहभागी व्यक्तींची नावे व योगदान यांचा समावेश आहे.

दस्ताऐवज आणि दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर

या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कालक्रमानुसार मांडणी केलेले घटनाक्रम, त्या काळातील राजकीय निर्णय आणि त्याचे लोकशाहीवर झालेले परिणाम यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणारे माहिती फलक. त्याशिवाय संविधानिक मूल्ये, मुलभूत अधिकारांचे उल्लंघन, माध्यमांवरची नियंत्रणाची परिस्थिती, अटकसत्रे आणि सामाजिक चळवळींचे दस्तऐवजीकरणही या प्रदर्शनात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी या प्रदर्शनाच्या संकल्पनेपासून प्रत्यक्ष मांडणीपर्यंतचे सविस्तर विवेचन उपस्थित मान्यवरांना दिले.

लोकसहभागासाठी खुले निमंत्रण

या प्रदर्शनाला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व माहिती विभागातर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पुढील काही दिवस खुले राहणार आहे.

00000000