साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता दि. १५ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे.

मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट, दोन फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पूर्ण पत्त्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, विकास महामंडळ (मर्या.), मुंबई- गृहनिर्माण भवन, कलानगर, तळमजला, रुम नं. ३३, वांद्रे (पू), मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि. १५ जुलै, २०२५ पर्यंत करावेत, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

*****

शैलजा पाटील/विसंअ/