मुंबई, दि. २३ : हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांना वॉटर ग्रीड १३२ या योजनेचा लाभ लवकर होण्यासाठी कामांमध्ये गती आणावी. तसेच पाणी पुरवठ्याची कामे तातडीने व गुणवत्तेने पूर्ण करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील ‘वॉटर ग्रीड १३२ पाणीपुरवठा योजनेचा’ सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कोळेकर, जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक इ.रविंद्रन, सह सचिव बी.जी.पवार, नांदेड जिल्ह्याचे संबंधित अधिकारी तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, ही योजना ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे यामधील अडथळे दूर करून, वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने कामे पार पाडावीत.
योजनेच्या निधी वितरण, पाइपलाइन काम, जलसाठा केंद्रांचे बांधकाम, तसेच पाणी परीक्षणाच्या बाबतीत प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा समस्येवर लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत सद्यस्थितीतील कामांची माहिती सादर करण्यात आली. विविध अडचणींचा आणि प्रस्तावित उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.
००००
राजू धोत्रे/विसंअ/