जनजाती गौरव वर्ष उपक्रमांमध्ये युवक-युवतींचा सक्रिय सहभाग आवश्यक – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, दि. २३ : केंद्र शासनामार्फत भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती वर्षभर साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘जनजाती गौरव वर्ष’ म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. देशाच्या आदिवासी समाजाच्या गौरवशाली वारशाला वंदन करण्याचा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. वर्षभर आयोजित विविध उपक्रमात राज्यातील युवक-युवतींचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके  यांनी सांगितले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सह्याद्री अतिथिगृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेस वनवासी विकास समितीचे कार्यप्रमुख वैभव सुरंगे, अनिल पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके म्हणाले, जनजातीय समाजाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांचा जन्म जनजातीय समाजात झाला याचा आपल्याला अभिमान आहे. जनजातीय समाजाने आपल्याला निसर्गसंवर्धनाचा मार्ग दाखवला आहे, जो आजही अनुकरणीय आहे.

केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ आणि ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबद्ध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाभरात १५ ते ३० जून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने जनजातीय गौरव वर्ष २०२५ चा भाग म्हणून शेवटच्या घटकापर्यतच्या आदिवासी समुदायांना विविध सेवा देण्यासाठी  शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

श्री.सुरंगे आणि श्री. पाटील यांनी स्वातंत्र्य संग्रामातील जनजातीय समाजाच्या योगदानाबाबत मनोगत व्यक्त केले.

****

शैलजा पाटील/विसंअ/