समाधानी समाजाची निर्मिती संवादातून – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई, दि. 23 : भगवान महावीरांनी सांगितलेले ‘संवादातून समाधानाकडे’ हे तत्व आजच्या काळात सर्वाथाने उपयुक्त आणि आवश्यक आहे. कारण सशक्त संवादातून समाधानी समाजाची निर्मिती होत असते, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

महाविरायतन फाउंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ‘संवाद से समाधान- एक परिचर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, महाविरायतन फाऊंडेशनचे देवेंद्र ब्रम्हचारी  यांच्या सह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, कोणत्याही प्रश्नाचे, समस्येचे निराकरण, पर्याय हा संवादातून, चर्चैतून निघत असतो. जगात लोकशाही संकल्पनेसाठी भारत आदर्श मानला जात असून संवादातून समाधानाकडे या तत्वाचा समावेश लोकशाही संकल्पनेत आहे. आपल्या देशातील सांस्कृतिक, भाषिक, भौगोलिक विविधता या सर्वांना एकत्रित ठेवत यशस्वी वाटचाल करण्यात भारताच्या लोकशाही संकल्पनेचा निश्चितच खूप मोठा वाटा आहे. भारतीय संस्कृतीत लोकशाहीचे तत्व प्राचीन काळापासून अंर्तभूत आहे. देशातील विविध संस्कृती, पंरपंरा, विविधता यांना एकमेकांशी जोडण्याचे काम लोकशाहीमुळे शक्य झाले आहे. भारताने लोकशाही संकल्पनेच्या माध्यमातून मागील ७५ वर्षाच्या वाटचालीतून एक आदर्श निर्माण केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे आपल्या देशाचे मूलभूत वैशिष्ट आणि संस्कृती ही लोकशाही आहे. सशक्त लोकशाही समाधानी संवादी समाजाच्या निर्मितीला पूरक वातावरण तयार करण्यात महत्वाची भूमिका निभावत असते. जगाचाही लोकशाही संकल्पना स्वीकारलेल्या देशांवर जास्त विश्वास आहे. लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो. त्यामुळे ग्रामपातळीवरील पंचायत पासून ते देशाच्या संसदेपर्यंत कोणत्याही प्रश्नावर, विषयावर चर्चेतून संवादातून मार्ग काढला जातो. भगवान महावीर यांचे तत्वज्ञान आजही उपयुक्त असून मनुष्याला मनुष्यत्वाकडे नेणारे विचार, सिद्धांत त्यांनी सांगितले जे आजच्या काळातही प्रासंगिक आणि उपयोगी ठरणारे आहेत. महावीरांनी सांगितलेले ‘जगा आणि जगू द्या’, अहिंसा, अपरिग्रह संयमव्रत, संवादातून समाधानाकडे यासह त्यांचे विविध सिद्धांत केवळ जैन समाजालाच नाही तर संपूर्ण मानवसमाजासाठी दिशादर्शक आहेत. संवादातून समाधानाकडे या तत्वाची आज जगाला गरज आहे. कारण जगातील विविध शंका, समस्या, चिंता, आव्हाने या सगळ्यांवर संवादातून समाधानकारक उपाय तोडगा निघू शकतो, असे श्री.बिर्ला यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भारत गौरव पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

0000

वंदना थोरात/विसंअ/