नागपूर, दि. २२: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घरे तयार झाली आणि आता नवीन अडीच कोटी घरांचे बांधकाम सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामध्येही ३० लाख घरे उपलब्ध होणार आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वांजरा येथील जागेवर बांधण्यात आलेले 480 सदनिकांचे हस्तांतरण व विविध विकास कामांचे लोकार्पण आज करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना सदनिकांच्या किल्ली सुपूर्द करण्यात आल्या.
नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., नगर विकास विभागाच्या विद्या हम्पय्या, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बांधकाम व्यावसायिक गौरव अग्रवाल, पीएमसीचे दिनेश वराडे यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मनपाने अतिशय उत्तम सदनिका तयार केल्याची भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सहाही विधानसभा क्षेत्र निहाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत किमान एक हजार घरांच्या इमारती उभारण्यात याव्या. जेणेकरून नागरिकांना राहण्याची उत्तम व्यवस्था होईल. झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना देखील मालकी हक्काचे पट्टे दिले जात असून, पुढील काळात सर्वाना पक्के घरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर हे हरित शहरांच्या यादीत असून येथील विकासासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक अशा ई बसेस देखील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा कमीत कमी उपयोग करून सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असेही श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष जयस्वाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्वप्ननिकेतन या सदनिकेबद्दल माहिती देत राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेबद्दल आभार मानले.
विविध विकास कामांचे लोकार्पण
सर्व सोयी सुविधांची परिपूर्ण असणाऱ्या स्वप्ननिकेतन सदनिकांच्या हस्तांतरणासोबतच मनपाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या पाचपावली अग्निशमन केंद्र, स्वच्छता विभागाच्या नव्या दोन चोकेज रिसायकलर मशीन, ओंकारनगर येथील स्मार्ट टॉयलेट, हॉट मिक्स प्लांट नवीन मशिनरी, कळमना जलतरण तलाव, २७ आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्र, ट्री ट्रान्सप्लांटर मशिन, अग्निशमन फायर टेंडर्स, राज्य शासनाच्या निधीतून प्राप्त बसेसचे आणि अंबाझरी दहन घाटाकडे जाणाऱ्या पुलाचे लोकार्पणासह मेहंदी बाग उड्डाणपुलाखाली, दही बाजार उड्डाणपुलाखाली, सक्करदरा उड्डाणपुलाखाली, दिघोरी उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणाचे काम, जे पी नगर मेट्रो स्टेशनच्या उभ्या भिंतीवर ग्राफिटी वर्क म्हणून ओळखले जाणारे प्रॉव्ह. लँडमार्क आर्ट पेंटिंग, चौकात महिलांच्या जीवनासह सायकलचे भित्तिचित्र, नरेंद्र नगर चौकात उभ्या असलेल्या अंतराळवीराचे भित्तिचित्र आदींचे लोकार्पण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या उत्कृष्ट अमलबजावणी बद्दल मनपाच्या चमूसह, एसडीपीएल व पीएमसी चमूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.