केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार
मुंबई, दि. २१ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा महापराक्रम आणि जाज्ज्वल्य इतिहासाला समर्पित ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ अर्थात परिक्रमेसाठी भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली. या सहा दिवसांच्या प्रवासात या विशेष रेल्वेच्या पर्यटक प्रवाशांना शिवप्रताप स्थळांच्या दर्शनाची पर्वणी लुटता आली. ही परिक्रमा शिवछत्रपतींना अभिवादनाची संधी देणारी संस्मरणीय अनुभूती असल्याचे सांगत, पर्यटक प्रवाशांनी रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि आयआरसीटिसीच्या या संयुक्त उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
भारत गौरव पर्यटन रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ९ ते १४ जून या दरम्यानची पहिली फेरी नुकतीच पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. ‘शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास, महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य अभिमान जागवणाऱ्या या उपक्रमाला पर्यटक प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकल्पनेला केंद्रीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने उत्स्फूर्त आणि सकारात्मक रित्या साकार केले आहे. यात सहभागी सर्व यंत्रणा आणि त्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही चोख जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, या सर्वांचे प्रयत्न देखील प्रशंसनीय आहेत. भारत गौरव रेल्वेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. या आणि अशा अनेक उपक्रम-प्रयत्नात महाराष्ट्र यापुढेही सदैव सज्ज आणि अग्रभागी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली आहे. अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांना पाठविले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट – भारत गौरव पर्यटन रेल्वेला शिवाराज्याभिषेक दिनी (९ जून) रोजी मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. त्यानंतर या विशेष रेल्वेने रायगड, पुणे – कसबा गणपती, लाल महाल आणि शिवसृष्टी, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, शिवनेरी, प्रतापगड, कोल्हापूर- महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा आणि परत मुंबई असा प्रवास पूर्ण केला.
मुंबईतून रवाना झाल्यानंतर रेल्वेने पहिला थांबा माणगांव (जि. रायगड) येथे घेतला. येथून पर्यटकांना विशेष बसद्वारा स्वराज्याची राजधानी रायगडकडे येथे घेऊन जाण्यात आले. काही प्रवाशांना रोप-वेतून, तर काही प्रवाशी पायी चालत रायगडावर पोहचले. याठिकाणी या पर्यटकांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षण आणि उत्साह अनुभवता आला. माणगांव-रायगड येथून रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी पर्यटक रेल्वे पुणे रेल्वे स्टेशन येथे पोहचली. येथून पर्यटकांना शिवसृष्टी, शिव पराक्रमाचा साक्षीदार लाल महाल, आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब महाराजांनी स्थापना केलेल्या मानाचा गणपती कसबा गणपती यांचे दर्शन घेता आले. तिसऱ्या दिवशी पुण्यातून पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी आणि परिसराचे दर्शन घडवून आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. चौथ्या दिवशी सकाळी रेल्वे पुणे येथून सातारा कडे रवाना झाली. पाचव्या दिवशी सातारा येथे आगमन आणि पुढे प्रतागगड येथे शिवप्रतापाचा साक्षीदार आणि शिवछत्रपतींनी बांधलेल्या गडाचे दर्शन घडवण्यात आले. यात गडावरील तुळजाभवानी मंदिर आणि परिसराची माहिती पर्यटकांना दिली गेली. या प्रवासात सह्याद्री पर्वत रांगामधील निसर्ग संपदेचा आणि विविध स्थळांच्या विलोभनीय दर्शनाचा आनंदही पर्यटकांना मनमुरादपणे घेता आला. सातारा येथून रात्री रेल्वे सहाव्या दिवसाच्या प्रवासासाठी कोल्हापूरला रवाना झाली. सहाव्या दिवशी कोल्हापूर येथे आगमनानंतर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरास भेट आणि श्री दर्शन. त्यानंतर पन्हाळगडास भेट, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या विविध वास्तूंसह, पन्हाळगड वेढ्यातून सूटका, महापराक्रमी बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद स्मारक आदी स्थळांची माहिती देण्यात आली. सहाव्या दिवशी सायंकाळी हे सर्व पर्यटक कोल्हापूर येथून मुंबईकडे परतले.
सहा दिवस आणि पाच रात्रींच्या या प्रवासात या पर्यटक प्रवाशांच्या निवास-चहा-नाष्टा आणि भोजन, स्थानिक प्रवास यांचीही चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासातील या सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन क्षेत्रातील घटकांनी पर्यटक प्रवाशांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श, पराक्रमाने पावन झालेल्या परिसरांची, स्थळांची प्रेरक माहिती मिळावी यासाठी तज्ज्ञ गाईडस् यांची व्यवस्था करण्यात आली. यामुळे या पर्यटक प्रवाशांनी भारत पर्यटन गौरव रेल्वेचे आणि या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. आयसीआरटीसीकडे तशा प्रतिक्रियाही त्यांनी उत्स्फुर्तपणे नोंदवल्या.
000