शेतमजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १८ :  शेतीतील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. कमी मनुष्यबळात काम करणे, मानवविरहित यंत्राचा वापर करणे, कृषी यांत्रिकीकरणासाठी शासन विविध कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना राबवत आहे शासन शेतक-यांच्या हितासाठी आलेल्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावरती कार्यवाही करेल असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघ महाराष्ट्र राज्यला आश्वासित केले.

 

मंत्रालयात आयोजित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नविषयक शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या बैठकीत कृषी मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्तालय पुणेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे कृषी आयुक्त सुरज मांढरे, संचालक रफिक नायकवडी, सुनिल बोरकर, विनयकुमार आवटे, डॉ. के. पी. मोते, शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, सदस्य बीडचे नाथराव कराड ,परभणीचे सदाशिव थोरात, कोल्हापूरचे सर्जेराव पाटील, साताराचे विश्वंभर बाबर, वाशिमचे रविंद्र गायकवाड, कर्जतचे पांडूरंग डोंगरे, साताराचे राजेद्र गायकवाड, ठाणेच बबन हरणे, नागपूरचे आत्मास्वामी खोपडे, जळगाव प्रविण पाटील-फरंकाडे यासह इतर पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, कृषी विषयक समित्यावर शासन निर्णय घेऊन कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सदस्य म्हणून घेण्यात येईल. शेतीविषयक कामांसाठी योग्य ते धोरण ठरविण्यात येईल शासनाकडे याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करू, पीकविमा योजनेत सुधारणा करणे, कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र यांना सक्षम करत आहोत. नवीन पिकाचे संशोधन करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत असते. जमिनीची सुपीकता वाढवून पिकाची उत्पादकता वाढविणे यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

राज्य शासन व केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाबाबत काही सूचना असतील तर त्यावरती जरूर विचार करू. शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ नक्कीच चांगल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करेल. नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून पिकाची उत्पादकता वाढवणे, कृषी विषयक प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांना ग्रामपंचायतीची कर आकारणी रद्द करणे याबाबत नक्कीच कार्यवाही करू. कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या प्रतिनिधीस आमंत्रित करून व्यासपीठावर एका सदस्याला उपस्थित राहण्याची संधी देण्याबाबत शासन कार्यवाही करेल, असेही कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

कृषिमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा केली

शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे अध्यक्ष कृषी भूषण ॲड. प्रकाश पाटील म्हणाले की, कृषी मंत्री यांनी राज्यातील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली आणि राज्यातील शेतीविषयक १६ विषयांवर चर्चा केली. मंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/