भूसंपादनाच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करणार – पालकमंत्री नितेश राणे

तळेरे- वैभववाडी- गगनबावडा रस्त्यासंदर्भात बैठक

सिंधुदुर्गनगरी दि.१२ (जि.मा.का.) : वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. या मार्गाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहतो. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झालेले आहे. या मार्गातील तळेरे- वैभववाडी रस्त्याच्या भूसंपादनाबाबत गांवकऱ्यांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने रस्त्याच्या हद्दीबाबत जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी यांनी कागदपत्रे तपासून प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्त्याच्या भूसंपादनाच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता  श्रीमती तृप्ती नाग, कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, प्रमोद रावराणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, कोकिसरे सरपंच प्रदीप नारकर, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, नगरसेवक रणजीत तावडे, संगीता चव्हाण, सुधीर नकाशे, दिलीप तळेकर, भालचंद्र साठे, गुलाबराव चव्हाण, संतोष कानडे, राजेंद्र राणे, अतुल सरवटे तसेच गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.