पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची सुरुवात — २५व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाची घोषणा

मुंबई, ११ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने पुलं कट्ट्याच्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या २५व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, हा सांस्कृतिक उपक्रम दि. १२ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नूतनीकृत अकादमीच्या नवीन खुल्या रंगमंचावर पुन्हा सुरू होत आहे.

‘पु. ल. कट्टा – कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ’ या संकल्पनेतून दर शुक्रवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध कलाकारांना आपल्या कलाकृती सादर करण्याची संधी या मुक्त रंगमंचावर दिली जाणार आहे.

उद्घाटनाच्या दिवशी गायक शार्दूल कवठेकर, गायिका अदिती पवार, हार्मोनिअम वादक प्रणव हरिदास, तबला वादक सौरभ शिर्के, अभिवाचक अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी आणि डॉ. कविता सोनावणे तसेच नृत्यांगना राधिका जैतपाळ हे उत्साही तरुण कलाकार सहभाग घेणार आहेत. यांच्यासोबत ज्येष्ठ कलाकार डॉ. शिरीष ठाकूर हेही आपल्या सादरीकरणातून पुलंना आदरांजली वाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी दरेकर करणार आहेत.

पुलंच्या साहित्यावर आधारित या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले आहे.
000