एकल प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केला एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प

मुंबई, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला. मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाले पाहिजे असा प्रयत्न आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी मंत्रालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचा एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन रामस्वामी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्स्फूर्तपणे तयार केलेली वापरातील एकल प्लास्टिकचा वापर टाळण्याची शपथ मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांना दिली. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे यावेळी वाटप करण्यात आले.

पर्यावरणाला हो आणि प्लास्टिकला नो म्हणा – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, पर्यावरणाचे संवर्धन हा एक महत्त्वाकांक्षी विषय असून आपण सर्वांनीच  पर्यावरणाच्या संवर्धनाची आवड जोपासणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी कार्यालयात सर्व कामकाजात कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातो, म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वप्रथम  मंत्रालयातील कामकाज कागद विरहित करून आपले पहिले पाऊल उचलूया. पर्यावरणाबद्दलची ही जनजागृती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवायची आहे. इतरांना जागृत करण्यासाठी सर्वप्रथम आपण जागरूक राहायला हवे.

पेपर व प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. प्लास्टिकच्या पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरात आणावी. प्लास्टिकला नो व पर्यावरणाला हो म्हणून आज पासून पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्याचे आवाहन मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

एकल वापर प्लास्टिक मुक्तीचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नेऊ – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, मंत्रालयात राबविण्यात आलेला पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम फक्त उपक्रम नसून हा एक जनसंदेश आहे. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जागरूकता आपण या उपक्रमामार्फत निर्माण करणार आहोत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या कुटुंबीय, सहकार्य व मित्र-मैत्रिणीना पर्यावरण जोपासण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती द्यायला हवी. कागद व प्लास्टिकच्या वापरास आळा घालून आपण या उपक्रमाची सुरुवात करूया. मंत्रालयात साडेनऊ हजार कर्मचारी कार्यरत असून या सर्वांनी एकल वापर प्लास्टिक मुक्तीचा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात नेऊ. माझे कार्यालय माझे घर प्लास्टिक मुक्त, पर्यावरण स्नेही ही फक्त घोषणा नसून त्याच्या अंमलबजावणीसाठी ठोस पाऊले उचलूया. प्लास्टिक मुक्त मंत्रालय हा संकल्प मनात ठेवून सर्वांनी कागदाचा वापर टाळू व कागद विरहित प्रणाली वापरात आणू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज यांनी प्रास्ताविकात विभागाच्या वतीने एकल वापर प्लास्टिक बंदीविरुद्ध करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

000

नंदकुमार वाघमारे/विसंअ