कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी कालमर्यादेत सर्वेक्षण करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

मुंबई, दि. 20 : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला. या प्रकल्पाच्या  सर्वेक्षणाची  कामे निविदेत दिलेल्या कालमर्यादेत  करावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे हस्तांतरित करणे आणि पवना धरण पर्यटन सादरीकरण संदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, या प्रकल्पातील कामांचेही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जलदगतीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. सर्वेक्षणाचे काम गतीने झाल्यास पुढील  कामांची निविदा प्रक्रिया राबविणे सुलभ व सोयीस्कर होणार आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्पातील

कामांचे सर्व्हेक्षण तीन महिन्यात पूर्ण करा

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, जागतिक बँकेचे अर्थसहाय्य असलेला महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास (एमआरडीपी) प्रकल्पातील कामांचे सर्वेक्षण गतीने करून ही काम तीन महिन्यात पूर्ण करावीत. यासाठी गरज भासल्यास अतिरिक्त एजन्सी नेमून सर्वेक्षणाचे काम जलदगतीने पूर्ण करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा.

आतापर्यंत या प्रकल्पातील ज्या कामांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे याची माहिती ‘मित्रा’ यांच्याकडे देण्यात यावी. राधानगरी धरणाचे गेट व सांगली कोल्हापूर बंधारा येथे बॅरेज बांधणे या कामांच्या यावेळी आढावा घेण्यात येऊन ही कामे सुरू करण्याबाबत जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

तसेच पवना धरण येते पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरण केले. पर्यावरणाचा समतोल राखत प्रदूषणविरहित पर्यटन आराखडा तयार करावा. याबरोबरच धरण परिक्षेत्रातील अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/