आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान अंबाजोगाई होणार कवितेचे गाव – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

बीड, दि.16 (जि. मा. का) : आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मस्थान असलेल्या अंबाजोगाईला कवितेचे गाव म्हणून जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केली.

येत्या 2 महिन्यात याबाबतची कार्यवाही पूर्ण केली जाईल. खोलेश्वर महाविद्यालय, योगेश्वरी महाविद्यालय, कवी मुकुंदराज समाधी स्थळ, शासकीय महाविद्यालय आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या पाच ठिकाणी या कवितांच्या गावातील दालन सुरू करण्यात येतील, असे श्री. सामंत सांगितले.

आज श्री.सामंत यांनी जिल्ह्यातील साहित्यकांशी संवाद साधला यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार संदिपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक तसेच अनिल जगताप यांची या पत्रकार परिषदेत उपस्थिती होती.

आजच्या साहित्यिक संवादात श्रीमती दीपा क्षीरसागर, विवेक निरगणे, संजय पाटील देवळाणकर, आनंद कराड, प्रभाकर साळेगावकर, सतीश साळुंके, बाळासाहेब पठारे, महेश वाघमारे, राजकिशोर मोदी तसेच अतुल कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.

आद्यकवी मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा ग्रंथ सध्या मुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी साहित्यिकांनी केली. त्यावर हा ग्रंथ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.

समन्वय अधिकारी नियुक्त

श्री.सामंत यांनी कवितेचे गाव ही संकल्पना घोषित केल्यावर ती यथाशिघ्र पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्वरित आदेश जारी केले.

या उपक्रमाच्या पूर्ततेसाठी अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना समन्वय अधिकारी म्हणून तर, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई हे सहसमन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.