– स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत तीन टप्प्यांसाठी जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित
– जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाच्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा अंतर्गत तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकास दर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अंमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करण्यास पालकमंत्री म्हणून आपले सदैव प्राधान्य राहील. अंमली पदार्थमुक्तीच्या दिशेने वाटचाल करताना प्रशासनातील सर्वांनी एकजुटीने काम केल्यामुळे गेल्या वर्षी अंमली पदार्थ विरोधी एकूण १३५ गुन्हे दाखल करण्यात आले. यासोबतच विद्यार्थी व युवकांमध्ये अंमली पदार्थ विरोधी प्रबोधन करण्यासाठी विविध स्तरावर काम सुरू आहे. नागरिकांनीही यात योगदान देण्यासाठी व भावी पिढी सुरक्षित राहण्यासाठी सर्व सांगलीकर, जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात वैयक्तिक घटकांमध्ये एक हजार 349 उद्योग उभारले आहेत. या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यात सांगली जिल्हा देशात तिसऱ्या स्थानी आहे. सांगली जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 64 हजार 146 मेट्रिक टन कृषि मालाची निर्यात केली आहे. यात फळे, भाजीपाला, अन्नधान्य व मसाला पिके यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जिल्ह्यातील 3 लाख 91 हजारहून अधिक लाभार्थींना एकूण 20 हप्त्यामध्ये 1537 कोटी 60 लाख रूपये वितरीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पीएम कुसूम व मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांमधून सांगली जिल्ह्यात एकूण 3 हजार 265 सोलर पंप बसवले आहेत. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी दुसऱ्या टप्प्यात 81 मेगावॅट क्षमतेच्या 13 सौर ऊर्जा प्रकल्पातून 60 गावातील 24 हजारहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणे शक्य झाले आहे.
जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ विस्तारीत-जत उपसा सिंचन योजनेची कामे चालू असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील पूर्णपणे व अंशतः वंचित अशा एकूण 65 गावांतील अंदाजे 26 हजार 500 हेक्टर क्षेत्र आगामी वर्षभरात सिंचित करण्याचे नियोजन आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी शाश्वत वीजपुरवठा व वार्षिक वीज खर्चात बचत करण्यासाठी संख येथे 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये एकूण ५३८ जात दाखला वितरण शिबिरे घेण्यात आली. त्यातून नागरिकांना जवळपास साडेसात हजार जातीचे दाखले वितरीत करण्यात आले. विविध सेवांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात लावलेले क्यू आर कोड स्कॅन केल्यास नागरिकांना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची यादी मिळण्यास मदत होत आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आरोग्य विभागाच्या एकूण कामास 93 कोटी रूपयांची मान्यता देण्यात आली आहे. कर्करोग जनजागृती वाहनाद्वारे जवळपास 7 हजार महिलांची कर्करोग तपासणी करण्यात आली आहे. तसेच, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत 591 कोटी 29 लाख रूपयांचा प्रकल्प मंजूर झाला असून पुढील कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दल मजबूत करण्यात येत आहे. यामध्ये पावणेदोन कोटी रूपयांतून सांगली जिल्हा पोलिस दलासाठी 16 वाहने तसेच, ई ऑफिसअंतर्गत संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. पोलीस ठाणे अंमलदार यांचे कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे, असे ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विविध नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख संकल्पना राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे, विश्वविक्रमी भक्तीयोग कार्यक्रमाबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व अमली पदार्थविरोधी प्रभावी कामकाजाबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी अमली पदार्थ जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते खालीलप्रमाणे पारितोषिक वितरण करण्यात आले.
१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत महसूल विभागांतर्गत पुणे विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे व तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ,
उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पदक व प्रमाणपत्र प्राप्त अधीक्षक सांगली जिल्हा कारागृहाचे सुभेदार सूर्यकांत पाटील, पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व इतर 8, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व इतर 4, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वश्री सिकंदर विष्णु वर्धन व इतर 4, संदीप कांबळे व इतर 5, संदीप शिंदे व इतर 8, दीपक भांडवलकर व इतर 3,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) मध्ये यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवलेली जिल्हा परिषद शाळा इरळीची राजेश्वरी भोसले, शिवछत्रपती विद्यालय, शिराळाचा विद्यार्थी आदित्य यादव, स्मार्ट सोलर चार्जिंग सिस्टीम फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल या उपकरणास महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा निगडी, ता. शिराळाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी.
घरेलू महिला कामगार मोहीम, लहान मुलांच्या ह्रदय शस्त्रक्रिया, अवयवदान मोहीम यशस्वीपणे पार पाडत असल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, आरोग्य क्षेत्रामध्ये उृत्कष्ट कामगिरीबद्दल स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब चोपडे, सन २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत १७५ लाभार्थ्यांच्या ह्रदय शस्त्रक्रिया व ४३७० लाभार्थ्यांवर इतर शस्त्रक्रिया पूर्ण करुन महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, सांख्यिकी अन्वेषक अनिता हसबनीस, विविध कार्यक्रमांकरिता अतिरीक्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्याबद्दल १०८ रुग्णवाहिका सांगलीचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. कौस्तुभ घाटुळे यांचा सन्मान करण्यात आला.
मृत्यूपश्चात अवयवदान करुन १४ लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल दिवंगत राजनंदिनी पाटील व शिवाजी नाईक यांचे वारस तसेच, अवयवदानातून दृष्टी मिळालेल्या सुमय्या शेख व अरुणिता राठोड यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हा पातळीवर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उत्कृष्ट कामगिरी केलेले सन २०२३-२४ पुरस्कार प्राप्त यशस्वी उद्योजक अग्रणी प्लास्टीक प्रा.लि. पुणदी, ता. तासगाव व कलापि इंजिनियरींग असो.प्रा.लि. एमआयडीसी कुपवाड, ता. मिरज यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
देशांतर्गत सुरक्षा संबंधी ऑपरेशन रक्षक अंतर्गत कुपवाडा जिल्ह्यातील अति उंचीच्या भागात कर्तव्य पार पाडताना दोन्ही पायांना हिमबाधा झाल्यामुळे अपंगत्व आले असल्याने मिरज तालुक्यातील आरग येथील नायक द्वारकेश बापू जाधव यांना व जम्मू कश्मिर येथे सैन्य सेवेत कार्यरत असताना शहिद झालेले खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग ऊर्फ बाबा शंकर भगत यांच्या पत्नी यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला.
कृषी विभाग राज्य शासनाच्या जनसमर्थ या ऑनलाईन पोर्टल वरून बँक ऑफ इंडिया, रांजणी शाखा यांनी पीक कर्ज र.रु. २ लाख मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार रांजणी येथील शेतकरी शशिकांत पवार यांना मंजुरी पत्र प्रदान करण्यात आले.
00000