ई-प्रशासनातून वेळेत व कार्यक्षम सेवा मिळतील; जिल्ह्यातील २२ विभाग ई-ऑफिस प्रणालीवर कार्यरत – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

भारताचा ७९ स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

नंदुरबार, दिनांक १५ ऑगस्ट, 2025 (जिमाका) : शासनाने १५० दिवसांचा ई-प्रशासन बळकटीकरणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. यात कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करणे आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यावर भर आहे, जेणेकरून नागरिकांना वेळेत व कार्यक्षम सेवा मिळेल.  मला सांगतांना अतिशय आनंद होतो आहे जिल्ह्यातील २२ विभाग या अभियानात ई-ऑफिस प्रणालीवर काम करताहेत. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

ते आज भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमात शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी खासदार ॲड. गोवाल पाडवी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार डॉ. हिना गावीत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, परिविक्षाधिन सनदी अधिकारी शिवांशु सिंह, उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, महेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, आदि अधिकारी-कर्मचारी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक हे उपस्थित होते.

बोलतांना पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. जान्हवी हेगडे हिने नैरोबी, केनिया येथे झालेल्या 17 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय रोलबॉल वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून गोलकीपर म्हणून सुवर्णपदक जिंकले. रिंकी पावरा हिने जर्मनीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये सलग दुसऱ्यांदा देशाचे प्रतिनिधित्व केले, तर सौरभ राजपूत आणि प्रणव गावित यांनी राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. जिल्ह्यात नंदुरबार, शहादा आणि तळोदा येथे क्रीडा संकुलांची उभारणी सुरू आहे, तसेच जिल्हा क्रीडा संकुलात नवीन इमारत, वसतिगृह, 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक आणि इनडोअर हॉलसाठी प्रयत्न सुरू आहेत. मिशन लक्षवेध अंतर्गत मैदानी खेळ व हॉकीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून, शाळा व ग्रामपंचायतींना क्रीडांगण आणि व्यायामशाळा विकासासाठी सुविधा दिल्या जातील.

ते पुढे म्हणाले, सन 2025-26 च्या खरीप हंगामात आपल्या नंदुरबार जिल्ह्यात 2 लाख 58 हजार 571 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना 87 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 32 हजार 18 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून ॲग्रीस्टॅक योजनेत 1 लाख 16 हजार 236 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य 580 हेक्टर, पौष्टिक तृणधान्य 350 हेक्टर आणि खाद्यतेल 200 हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके राबवली जात आहेत. मनरेगा अंतर्गत 2024-25 मध्ये 2 हजार 900 हेक्टर फळबाग लागवड झाली असून, 2025-26 साठी 2 हजार 500 हेक्टर लक्ष्यापैकी 850 हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय कृषि विकास योजनेतील ‘प्रति थेंब अधिक पिक’ अंतर्गत 904 लाभार्थ्यांना 7 कोटी 34 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पशुधनावरील लंपी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. पशुपालकांनी गायी व वासरांचे तात्काळ लसीकरण करून घ्यावे. आतापर्यंत 1 लाख 92 हजार 980 जनावरांना लस देण्यात आली असून 2 लाख 8 हजार 700 लसी उपलब्ध आहेत. आजारी जनावरांची काळजी घ्या, त्वरित उपचार करा आणि रोग नियंत्रणासाठी सहकार्य करा. तसेच  मधाचे गाव योजनेंतर्गत नवापूर तालुक्यातील बोरझर गावाची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी 48 लाखांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

पालकमंत्री ॲड. श्री. कोकाटे पुढे बोलतांना म्हणाले की, आजपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकांनावर सोप्या पद्धतीने बँकिंग सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट बँकेच्या सहकार्याने ‘मिनी बँक’ योजना सुरू करण्यात येत आहे. 79 केंद्रांवर पैसे काढणे-जमा करणे, खाते उघडणे, एटीएम, डीबीटी लिंक, मोबाईल रिचार्ज, विमा नोंदणी, फास्टॅग व कर्जासाठी मार्गदर्शन अशा सेवा दिल्या जातील. या योजनेमुळे गावकऱ्यांना आपल्या गावातच बँकिंग, सरकारी लाभ थेट खात्यात आणि डिजिटल व्यवहाराची सुविधा मिळत आहे. लवकरच ही सुविधा 1 हजारहुन अधिक स्वस्त धान्य दुकानांच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात ‘ग्रामसंवाद अभियान’ सुरू झाले असून, या उपक्रमातून प्रशासन थेट गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण जागेवरच करत आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार दर आठवड्याला किमान दोन दुर्गम गावांना भेट देऊन शाळा, आरोग्य केंद्र, बँक, पोस्ट ऑफिस यांसारख्या ठिकाणांचा आढावा घेत आहेत आणि आवश्यक ते बदल घडवत आहेत. या मोहिमेमुळे शासकीय सेवा आता गावपातळीवरच मिळत असून, वेळ, श्रम आणि खर्च वाचत आहे, तक्रारी कमी होत आहेत आणि शासन-प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होत आहे. ‘गावात प्रशासन, गावात संवाद’ या मंत्राने ग्रामीण विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, गावांच्या विकासाला गती देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ सुरू करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनामार्फत 120 ग्रामपंचायतींसाठी ‘आदर्श ग्राम अभियान’ व महिला बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या दूर करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे, या सर्व उपक्रमांमधून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसे व पुरस्कार देण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्साहाने सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल करावे, असेही  आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजागृती अभियान’ 6 तालुक्यातील 177 आदिवासी बहुल गावांत यशस्वीपणे राबविण्यात आले. सर्व विभागांच्या सक्रिय सहभागातून आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे, तसेच सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण घडवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

पालकमंत्री ॲड. श्री. कोकाटे पुढे बोलतांना म्हणाले की, वित्तीय वर्ष 2025-26 साठी नंदुरबार जिल्ह्यासाठी वार्षिक योजनेचा 656 कोटी 54 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला असून, त्यात सर्वसाधारण योजनेसाठी 213 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 429 कोटी 54 लाख आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 14 कोटी रुपये तरतूद आहे. एप्रिल ते जुलै 2025 मधील खर्चासाठी 30 टक्के निधी, तर डिसेंबर 2025 पर्यंतच्या योजनांसाठी 60 टक्के निधी शासनस्तरावरून वितरित होणार आहे. योजनांना वेळेत प्रशासकीय मान्यता व निधी वितरण होऊन विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.

 

आपल्या जिल्ह्यातील शिक्षण सुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत 9 शाळांसाठी 12 वर्गखोल्या बांधण्यासाठी 1 कोटी 56 लाख रुपये, तसेच 5 इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सेस निधीतून 20 कोटी 50 लाख रुपये मंजूर होऊन 76 शाळांसाठी 115 वर्गखोल्या, तर एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्याने 6 शाळांसाठी 24 वर्गखोल्या उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, तोरणमाळ येथील निवासी शाळेत काँक्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात तृतीयपंथीय व्यक्तींची नोंदणी करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी समाजकल्याण विभागात तृतीयपंथी कक्ष सुरू करण्यात आला आला असून त्यांचे उद्घाटन पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले आहे.   या कक्षामार्फत प्रत्येकाची स्वतंत्र संचिका तयार करून शासकीय योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सर्व तृतीयपंथीयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गेल्या 1 मे महाराष्ट्र दिनी आपण ‘आमची अभ्यासिका’ हा ग्रामीण भागातील वाचनालयाचा उपक्रम सुरु केला होता, या उपक्रमाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या 110 वाचनालयांचे लोकार्पण आज या ठिकाणी आपण करत आहोत.   जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून 38 रुग्णांना 39 लाख 55 हजारांची मदत वितरीत करण्यात आली आहे.  स्ट्रॉबेरी, आमचूर, सेंद्रिय शेतीउद्योगाच्या यशोगाथा आता सोशल मीडियावर झळकणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 यांचा झाला सन्मान…

 

  • 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालये..
क्र. अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव पदनाम स्पर्घेतील क्रमांक

(गृप क्रमांक)

1 चेतन‍ कुमार ठाकरे उपविभागीय कृषी अधिकारी, नंदुरबार प्रथम
2 निलेश संभाजीराव पाटील उप विभागीय जलसंधारण अधिकारी, शहादा व्दितीय
3 ललित आशा दिलीप गवळी वन परिक्षेत्र अधिकारी, अक्कलकुवा तृतीय
4 राहुल आशा बाबाजी वाघ मुख्याधिकारी, नगर परिषद, नंदुरबार तृतीय
5 इंजि. नितीन तानाजी वसावे उप विभागीय अधिकारी (सार्वजनिक बांधकाम), उपविभाग क्र.02, तळोदा तृतीय
6 रमेश मोहन शिंदे तालुका कृषी अधिकारी, अक्राणी तृतीय

 

  • नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र वितरण..
क्र. पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदाराचे नाव
1 उप वि.पो.अधि. कार्यालय, नंदुरबार संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, नंदुरबार
2 उप वि.पो.अधि. कार्यालय, शहादा दत्ता पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, शहादा
3 शहर पो.नि. हेमंतकुमार पाटील,
पोकॉ 771 प्रविण वसावे
5 नवापूर पो.नि. अभिषेक पाटील
पोकॉ 73 किशोर वळवी
7 शहादा पोउनि अमरसिंग वसावे
पोहेकॉ 1137 देविदास विसपुते
9 महिला सेल मपोउनि माया राजपुत
10 स्थानिक गुन्हे शाखा पोउनि मुकेश पवार
पोकॉ 699 अभय राजपुत
पोशि/241 शोएब जब्बार शेख

 

  • 79 रास्तभाव दुकानांमध्ये मिनी बॅक सुरु करण्यात येणार आहे. त्यापैकी 02 रास्तभाव दुकानदारांना मिनी बॅक कीट वाटप करण्यात येत आहे.

1) मगन ब्रिजलाल पाडवी, नवापाडा, ता. अक्कलकुवा

2) विक्रम रेगा वळवी, लहान राजमोही, ता. अक्कलकुवा

 

  • महा आवास अभियान – ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था/ व्यक्तींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह..
क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक क्रमांक पुरस्कारार्थी
1 प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत सर्वोकृष्ठ तालुका प्रथम पंचायत समिती, शहादा
व्दितीय पंचायत समिती, नवापूर
तृतीय पंचायत समिती,नंदुरबार

 

  • स्मार्ट ग्राम योजना जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत जिल्हा स्मार्ट ग्राम व तालुका स्मार्ट ग्राम म्हणून ग्राम पंचायतीची निवड..
क्र. सन पुरस्काराचा प्रकार तालुका तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत
1 2022-23 जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम शहादा बामखेडा
2 2022-23 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम तळोदा दसवड
3 2022-23 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम धडगाव कुकतार
4 2022-23 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम अ.कुवा कडवामहु
5 2022-23 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम नंदुरबार शिंदगव्हाण
6 2022-23 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम नवापूर बोकळझर

 

क्र. सन पुरस्काराचा प्रकार तालुका तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत
1 2023-24 जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम शहादा जयनगर
2 2023-24 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम तळोदा तळवे
3 2023-24 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम नंदुरबार बालआमराई
4 2023-24 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम धडगाव वेलखेडी
5 2023-24 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम नवापूर गंगापुर
6 2023-24 तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम अक्कलकुवा आमली

 

  • जिल्ह्यातील व्यक्तींनी उदार अंत:करणाने अवयवदान करुन गरजु लोकांचे प्राण वाचविले अशा अवयव दात्यांचा सत्कार..
क्र. अवयव दात्याचे नाव दान केलेल्या अवयाचे नाव
1 मनिलाल रामदास पाटील,रा. प्रकाशा ता. शहादा,जि. नंदुरबार किडनी
2 श्रीमती रेखा रविंद्र चौधरी, रा. नंदुरबार किडनी
3 शैलेंद्र दत्तात्रय चौधरी, रा. नंदुरबार किडनी
4 श्रीमती रिजवना मेहमुद कुरेशी, रा. नवापूर, जि. नंदुरबार किडनी

 

यावेळी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आले तसेच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेच्या मोटारसायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

00000