राज्यात वाळू वाहतुकीसाठी काही अटींसह २४ तास परवानगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ३ : राज्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या कालावधीत वाळू वाहतुकीवर असलेली बंदी हटवून, काही अटींसह २४ तास वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. वाळूचे उत्खनन सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच करता येईल. मात्र, या वेळेत उत्खनन करून ठेवलेली वाळू वैध वाहतूक परवाना (eTP/CTP) घेतलेल्या वाहनांद्वारे २४ तास वाहतूक करता येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, वाढती वाळूची मागणी आणि वाहतुकीवरील निर्बंधामुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला आहे. अनेक शहरे व ठिकाणी वाहतूक गर्दीमुळे दिवसा वाळू वाहतुकीवर निर्बंध होते. तसेच, परराज्यातून येणाऱ्या वाळूस झिरो रॉयल्टी पासद्वारे २४ तास वाहतूक करता येते. मात्र, राज्यातील वाळू वाहतुकीस सायंकाळी ६ नंतर बंदी असल्यामुळे स्थानिक वाळूचा पुरेपूर उपयोग होऊ शकत नव्हता. आता वाळू वाहतुकीसाठी २४ तास eTP परवाना तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यासाठी उत्खनन करून ठेवलेल्या वाळूचे स्वतंत्र Geo-Fencing, वाळू/रेती गटांवर सीसीटिव्ही प्रणाली बसविणे,वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवणे इत्यादी अटी बंधनकारक असतील.
००००
शैलजा पाटील/विसंअ