मुंबई, दि.२८: भारतात संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. सर्व नागरिक, राजकीय पक्ष आणि भारत निवडणूक आयोग संविधानाचे पालन करतात. भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसार, फक्त भारतीय नागरिक, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि जे संबंधित मतदारसंघात वास्तव्यास आहेत, तेच मतदार होण्यासाठी पात्र असतात. बिहारमध्ये विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीम (Special Intensive Revision – SIR) यशस्वीपणे सुरू झाली असून, सर्व राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग या प्रक्रियेत आहे. निवडणूक आयोगाकडे सध्या ७७,८९५ बूथ स्तर अधिकारी (BLO) कार्यरत आहेत, तर नवीन मतदान केंद्रांसाठी आणखी सुमारे २०,६०३ BLO नियुक्त करण्यात येत आहेत. या मोहीमेदरम्यान, अधिकृत मतदारांना, विशेषतः वृद्ध, आजारी, दिव्यांग (PWD), गरीब व इतर दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी एक लाखाहून अधिक स्वयंसेवक कार्यरत असतील. ECI मध्ये नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आतापर्यंत १,५४,९७७ बूथ स्तर एजंट (BLA) नियुक्त केले आहेत. पक्षांना अजूनही अधिक एजंट नेमण्याची मुभा आहे.
बिहारच्या सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान ७,८९,६९,८४४ मतदारांसाठी नवीन गणना फॉर्म (Enumeration Form – EF) छापण्याचे आणि घरोघरी वितरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबतच, ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. या ७.८९ कोटी मतदारांपैकी ४.९६ कोटी मतदारांची नावे १ जानेवारी २००३ रोजीच्या अंतिम मतदार यादीत आधीच आहेत, अशा मतदारांनी केवळ ते पडताळून, फॉर्म भरून सादर करायचा आहे. या विशेष मोहिमेत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी BLO ना पूर्णवेळ या कार्यात गुंतवून घेत आहेत. राज्यातील ५,७४,०७,०२२ नोंदणीकृत मोबाईल नंबरवर SMS द्वारे देखील माहिती पाठवली जात आहे, जेणेकरून नागरिकांना प्रक्रिया अधिक सोयीची आणि पारदर्शक वाटेल. या विशेष व्यापक पुनरिक्षण मोहिमेतील सर्व उपक्रम वेळापत्रकानुसार यशस्वीरित्या पुढे चालू आहेत, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
०००