मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल – बाल – पाल या त्रयींसह महाराष्ट्र, पंजाब व पश्चिम बंगालने देशाला नेतृत्व प्रदान केले, असे नमूद करून विकसित भारताचे लक्ष्य गाठताना देखील महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल मोठे योगदान देईल, असा विश्वास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते.
पश्चिम बंगाल देशातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून या राज्याने देशाला वैज्ञानिक, चित्रपट निर्माते, संगीतकार व कलाकार दिले आहेत. बंगालने देशाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. मेघनाद सहा, हिरेन मुखर्जी, प्रणब मुखर्जी, सोमनाथ चॅटर्जी यांसारखे संसदपटू दिले असे सांगून आपल्याला प्रणब मुखर्जी व सोमनाथ चॅटर्जी यांच्या कार्यकाळात काम करण्याची संधी मिळाली असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी नमूद केले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालच्या लोकसंस्कृतीचे लोकगीत व नृत्याच्या माध्यमातून उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव करुणा वावडणकर यांनी आभार मानले. राज्यपालांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. केदारनाथ कळवणे, मुंबईतील बंगाली भाषिक निमंत्रित, विद्यापीठाचे विद्यार्थी, कलाकार तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांनी यावेळी सजीव चित्रकला सादर करीत आपल्या कलाकृती राज्यपालांना भेट दिल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालचे ‘एलो दुर्गा माँ’ लोकगीत, रवींद्रनाथ टागोर यांच्या दृष्टीतून पश्चिम बंगाल हे एकपात्री सादरीकरण, रैबेनशे लोकनृत्य व मुलींचे झुमर लोकनृत्य सादर केले.
०००