जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी सर्व यंत्रणांनी कामे प्रस्तावित करावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा नियोजन समितीची सभा; सन २०२५-२६ साठी ६३२ कोटी, २९ लाखांचा निधी मंजूर

  • वर्गखोल्या बांधकामे, दुरूस्ती प्राधान्याने करण्याचे निर्देश
  • प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्रासाठी राज्य स्तरावर बैठक घेणार

सांगली, दि. १६ (जिमाका): जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जात आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याचा चौफेर विकास होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी विकासकामे प्रस्तावित करावीत व नियोजनबद्ध कार्यवाही करावी. यासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कामांचा नियमित आढावा घेतला जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री अरुण लाड, सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सन्माननीय सदस्य व जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्याबरोबरच ती मुदतीत पूर्ण व्हावीत. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री पाटील  म्हणाले, जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा, यादृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वयाने विकासकामांचा चांगला आराखडा प्रस्तावित करावा. प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामांच्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. पावसाळा संपताच कामांचे कार्यादेश दिले जातील, यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले.

पालकमंत्री पाटील  म्हणाले, शिक्षण क्षेत्र हा आपला सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी, शालेय वर्गखोल्या नवीन बांधकाम व दुरूस्तीची सर्व कामे या आर्थिक वर्षाखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. विद्यार्थी नोंदणी, विद्यार्थ्यांच्या आधार लिंकिंगसाठी तातडीने कार्यवाही करावी. त्यासाठी तालुकास्तरीय शिबिरांचे आयोजन करावे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील  म्हणाले, वन विभागाने त्यांच्या ताब्यातील जमिनींवर प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटन केंद्र होण्याच्या दृष्टीने कामनिहाय निधी मागणीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, यासंदर्भातील कार्यवाही व येणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल. तसेच, पाटबंधारे विभागाच्या जागेत पर्यटन विकासाच्या दृष्टीने वास्तुविशारद नेमून बृहद आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊ. तसेच, रेल्वेशी निगडीत प्रश्नांसाठी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. रेल्वेबाबतच्या प्रश्नांसंबंधी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजनेतून सन 2024-25 मध्ये माहे मार्चअखेर 570 कोटी 41 लाख रुपये खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी  99.55 टक्के इतकी आहे. तर सन 2025-26 साठी गत वर्षीच्या तुलनेत 59 कोटी 28 लाखांची वाढ करून 632 कोटी, 29 लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जिल्हा नियोजनच्या समितीच्या या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्रातील योजनांचा सन 2024-25 चा माहे मार्च अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात येऊन मार्चअखेरच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच सन 2025-26 साठीच्या नियोजनासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये कृषि व कृषि संलग्न सेवा क्षेत्र यासाठी 28 कोटी, 38 लाख, ग्रामविकास साठी 48 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास साठी 66 कोटी 53 लाख, पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी 25 कोटी, ऊर्जा विकासासाठी 58 कोटी 52 लाख, रस्ते विकासासाठी 47 कोटी 50 लाख, सामान्य शिक्षणासाठी 48 कोटी 4 लाख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह आरोग्य क्षेत्रासाठी 80 कोटी 36 लाख, तीर्थक्षत्र, पर्यटन व गडकिल्ल्यांसाठी 32 कोटी 40 लाख, महिला व बालविकाससाठी 15 कोटी 8 लाख, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास 8 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांनी मांडलेल्या मौजे मरळनाथपूर, रेठरे धरण (ता-वाळवा) व गोरक्षनाथ येथील निसर्ग पर्यटन विकास मंडळाचा आराखडा, वीर शिवा काशिद स्मारक, गुहागर – विजापूर महामार्गालगतचे जोडरस्ते महामार्गाला व्यवस्थित जोडले जाणे, कुंडल येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बांधकामाचा प्रस्ताव, बिरोब देवस्थान आरेवाडीच्या पर्यटन विकासाचा आराखडा, मिरज येथे ऐम्स रुग्णालय, शालेय विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंग, नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम व सदस्थितील वर्ग खोल्यांची दुरुस्ती, पूरपरिस्थिती नियंत्रण, अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेची कारवाई, नंदादीप प्रकल्पाअंतर्गत जत तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील दुध भेसळ, विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) आदि विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीचे 9 विशेष निमंत्रित व 2 नामनिर्देशित सदस्यांची पालकमंत्री यांची शिफारस करून शासनास पाठवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, गत आर्थिक वर्षात जवळपास 100 टक्के निधी खर्च केल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पालकमंत्री व अन्य मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. वडाच्या रोपास पाणी घालून बैठकीस प्रारंभ करण्यात आला.

०००