‘दिलखुलास’ कार्यक्रमात संचालक सतिशकुमार खडके यांची मुलाखत

मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आपत्ती पूर्व व आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन व अंमलबजावणी’ या विषयासंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतिशकुमार खडके यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. १६ मंगळवार दि.१७ बुधवार दि.१८ गुरुवार दि. १९ आणि शुक्रवार दि.२० जून २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आजच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वाढते तापमान, वेळी-अवेळी पडणारा पाऊस आणि इतर अनपेक्षित नैसर्गिक घटना यामुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी राहात आहेत. नैसर्गिक आपत्तींपासून ते मानवनिर्मित आपत्तींपर्यंत आणि आगीसारख्या दुर्घटनांपर्यंत अनेक घटनांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. या संकटांचा शास्त्रशुद्ध, प्रभावी आणि सुसंघटित पद्धतीने सामना करण्यासाठी शासनाकडून सातत्याने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही त्रिस्तरीय यंत्रणा अखंडपणे कार्यरत असून, आपत्तीपूर्व नियोजन, तत्काळ प्रतिसाद आणि पुनर्वसन या सर्व टप्प्यांवर ही यंत्रणा सजगतेने काम करत आहे.

आपत्ती टाळता यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण व्हावे, यासाठी विविध स्तरांवर नियोजनबद्ध कार्यवाही केली जाते. गावपातळीवर स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्याशी समन्वय साधून, सामूहिक जबाबदारीने आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले जाते. या विषयावर ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून  संचालक श्री. खडके यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/ससं/