मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी, आणि बंधुभाव घेऊन येवो, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
आपले राज्य ही सर्वधर्मसमभावाची भूमी आहे. येथे विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृतीचे लोक प्रेमाने आणि सौहार्दाने राहतात. अशा या राज्यात बकरी ईदच्या दिवशी आपण एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हावे. सण म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर सामाजिक सौहार्दाचे सशक्त माध्यम आहे. हा सण आपल्याला परस्पर प्रेम, समर्पण आणि समाजातील गरीब गरजू लोकांबद्धल सहानुभूती बाळगणे शिकवतो. बकरी ईदच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ करावे, हीच अपेक्षा आहे,असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.