मुंबई, दि. १२: राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे. यातंर्गत उद्या, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे होणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिनांक ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणपती, ईद, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात मिठाई, मोदक, फराळ, प्रसाद या सारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत काही अन्न व्यावसायिकांकडून अयोग्य किंवा भेसळयुक्त अन्न तयार व विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळे, मिठाई उत्पादक, मोदक व फराळ तयार करणारे महिला बचत गटांसाठी अन्न स्वच्छतेवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर कळवाव्यात, असे आवाहनही माने यांनी केले आहे.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/