उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात येतील. कौशल्य विकास विभागाकडे जवळपास ६ हजार कोटींचा निधी उपलब्ध असून या मधून राज्यातील सर्व आयटीआय चे सक्षमीकरण करण्याला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
सातारा एमआयडीसी येथील मास भवन मध्ये  उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी, इंडस्ट्रियल मिट चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मनोज घोरपडे, श्रीमती प्रिया महेश शिंदे, उद्योग विभागाचे सहसंचालक चंद्रकांत ढेकणे, मासचे अध्यक्ष संजोग मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, उद्योगजगात आणि शासन यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. उद्योगजग आनंदी असेल तर विकासाला हातभार लागतो. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चंगली आहे. अनेक उद्योग महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक आहेत. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तरुण पिढीला नवनवीन कौशल्य वृध्दी झाल्यास त्यांच्याही हाताला काम मिळेल या कौशल्य विकासासाठीच आयटीआय मध्ये नवनवीन कोर्सेस सुरु केले जात आहेत. पार्ट टाईम प्रशिक्षण कोर्सेंसही लक्षात घेवून सुरु करता येतील. मासमध्येही सातारा येथील उद्योगांना पूरक ठरेल असे स्किल सेंटर उभे करावे. त्याला 30 दिवसात आवश्यक त्या सर्व परवाणग्या व निधी उपलब्ध करुन देता येतील.
या इंडस्ट्रियल मिटमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उद्योजकांशी मोकळेपणाने संवाद साधून कुशल मनुष्यबळ विषयक त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर सकारात्मक पावले टाकण्यात येतील, असे आश्वस्त केले.
यावेळी आमदार मनोज घोरपडे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी जमिन यासर्वच बाबतीत संपन्न आहे.  पुढील काळात या ठिकाणी मोठया प्रमाणात नवनवीन उद्योग यावेत, यासाठी सर्वातोपरी प्रयत्न केले जातील.
या  याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील अनेक उद्योजक आयटीआय चे प्राचार्य उपस्थित होते.
0 0 0 00