नवी दिल्ली १२: भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींची भावनिक प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करताना म्हटले, “मराठा साम्राज्याचा उल्लेख होताच सुशासन, सैन्यशक्ती, सांस्कृतिक गौरव आणि सामाजिक कल्याणाचा आदर्श डोळ्यासमोर येतो. या महान शासकांनी अन्यायाविरुद्ध न झुकण्याची प्रेरणा आपल्याला दिली आहे.” त्यांनी 2014 मध्ये रायगड किल्ल्याला दिलेल्या भेटीची आठवण सांगताना म्हटले, “रायगडावरील ती भेट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली.” त्यांनी सर्व नागरिकांना या किल्ल्यांना भेट देऊन मराठा इतिहासाची माहिती घेण्याचे आवाहन केले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 12 किल्ल्यांचा समावेश
या यादीत मराठा साम्राज्याच्या 12 भव्य किल्ल्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले—रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील एक किल्ला—जिंजी यांचा समावेश आहे. या किल्ल्यांना ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ या संकल्पनेअंतर्गत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ (Outstanding Universal Value) म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मराठा स्थापत्यशास्त्रातील माची स्थापत्य, जे गडाच्या सुरक्षिततेसाठी आणि युद्धकौशल्यासाठी अद्वितीय आहे, याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हे स्थापत्य जगातील इतर कोणत्याही किल्ल्यांमध्ये आढळत नाही.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारचे योगदान
या यशामागे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे एकत्रित प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. पंतप्रधान मोदी यांच्या पाठिंब्याने आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) तसेच संस्कृती मंत्रालयाच्या सहभागाने हा टप्पा गाठता आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशासाठी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी यांचे आभार मानले आहेत. शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन तांत्रिक सादरीकरण केले, ज्यामुळे या यशाला गती मिळाली.
मराठा स्थापत्यशास्त्राचे अद्वितीय वैशिष्ट्य
मराठा किल्ल्यांचे माची स्थापत्य हे त्यांच्या रणनीतिक आणि अभेद्य रचनेसाठी प्रसिद्ध आहे. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे बांधकाम हे मराठा साम्राज्याच्या युद्धकौशल्याचा आणि मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या निर्मिती आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. युनेस्कोच्या मान्यतेमुळे या स्थापत्यशास्त्राला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
पर्यटन आणि सांस्कृतिक जतनाला चालना
या युनेस्को मान्यतेमुळे मराठा इतिहासाला जागतिक व्यासपीठावर नवा गौरव प्राप्त झाला आहे. यामुळे पर्यटन, इतिहास संशोधन आणि सांस्कृतिक जतनाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.
०००
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली