पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिवस व पुरस्कार सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 8 :- अनुसूचित जातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसेच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा व आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ८ जुलै) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, पीपल्स एज्युकेशन सोसायटी  शैक्षणिक संस्था व वसतिगृहे निर्माण करून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना आज अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेवर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवत आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न देखील हेच होते, असे सांगून आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, मात्र विद्यार्थी व युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे. सन २०४७ पर्यंत देश विकसित भारत म्हणून उदयास येईल व डॉ आंबेडकर यांचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त करताना विकास हा सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” प्रदान करण्यात आले.

संस्थेने स्वायत्त विद्यापीठासाठी प्रस्ताव सादर करावा – मंत्री चंद्रकांत पाटील

आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो याचा अभिमान वाटतो. राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची पायाभरणी याच संस्थेमधून झाली आहे.  पिपल्स एज्युकेशन सोसायटीने गेल्या ८० वर्षांत महाविद्यालये, वसतिगृहे आणि विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून समाजाला शिक्षण दिले आहे. या संस्थेने स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.  पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्वायत्त विद्यापीठ झाल्यास संस्थेला नवनवीन अभ्यासक्रम राबविता येतील असे सांगून मंत्री श्री. पाटील यांनी संस्थेच्या विकासासाठी शासनाच्यावतीने सहकार्याची ग्वाही दिली.

आधुनिक वसतिगृहे उभारण्याचा मानस – मंत्री संजय शिरसाठ

सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात 120 आधुनिक विद्यार्थ्यांची वसतिगृहे उभारण्याचा मानस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे, भीमा कोरेगावला 100 कोटींचा निधी, महाडच्या ऐतिहासिक चौदार तळासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर ही डॉ.बाबासाहेत आंबेडकर यांची कर्मभूमी होती. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाचे आपण माजी विद्यार्थी होतो असे सांगितले.

मिलिंद कॉलेज परिसराचा  कायापालट करण्याचा आपला संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  बाबासाहेब आंबेडकरांमुळेच नाव, ओळख, आणि समाजासाठी काम करण्याचं बळ मिळालं. त्यांच्यामुळेच आज यशाच्या पायऱ्या चढत असल्याची भावना मंत्री शिरसाठ यांनी व्यक्त केली.

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व  संस्थेचे विश्वस्त अॅड. उज्वल निकम यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी, दक्षिण कोरिया येथील धम्मदीप भंते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, एड. सुरेंद्र तावडे, बळीराम गायकवाड यांना देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000000