अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक – मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा (ऑनलाईन) देत असलेल्या कंपन्यांच्याबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी विभागाकडून लवकरच टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
विधान परिषद सभागृहात अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत लक्षवेधी सदस्य संदीप जोशी यांनी मांडली होती. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य एकनाथ खडसे , सत्यजित तांबे, प्रविण दरेकर, उमा खापरे, अशोक ऊर्फ भाई जगताप, चित्रा वाघ, डॉ. परिणय फुके, सदाशिव खोत आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला.
मंत्री झिरवाळ म्हणाले, राज्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नियम व नियमने मधील तरतुदींनुसार नियमानुसार झेप्टो, स्वीगी, झोमॅटो इत्यादी कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. एकूण ४३ अन्न ई-कॉमर्स आस्थापनांपैकी सखोल तपासणी दरम्यान अस्वच्छता तसेच गोदामात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले. या गभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. ३४ अन्न आस्थापनांना त्रुटींच्या सुधारणा नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. एक परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पाच अन्न आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्री झिरवाळ म्हणाले, ई-कॉमर्स आस्थापना या केंद्रीय परवानाधारक आस्थापना असून सदर आस्थापनांच्या गोदामांसाठी राज्याचा परवाना देण्यात येतो. या गोदामांच्या तपासण्या वाढविण्यात येत आहेत.
०००
किरण वाघ/विसंअ/