मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. ‘महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल, असे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंती व कृषी दिनानिमत्ताने ‘महाकृषी एआय धोरण या विषयावर कृषी विभागातर्फे कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव श्रीकांत आडगे, विभागीय कृषी संचालक बालाजी ताटे यासह राज्यातील प्रगतशील शेतकरी, ॲग्रीहॅकेथॉन विजेते, कृषी स्टार्टअप्स यावेळी उपस्थित होते.
कृषी आयुक्त मांढरे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने या कार्यशाळेच्या माध्यमातून एक विचारमंथन घडवून आणले आहे. कार्यशाळेतील विविध कृषीविषयक सादरीकरण अभ्यासपूर्ण असून शेतकऱ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. जगात प्रत्येक क्षेत्रात एआय च्या वापराने सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. कृषी विभागात सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी महाकृषी एआय धोरणासंदर्भात सादरीकरण केले. हे धोरण शेतीमध्ये क्रांती घडवेल असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अचूक काम करून घेण्यासाठी सर्वप्रथम एआय ला अचूक महत्वपूर्ण महिती पुरवणे आवश्यक आहे. महाडीबीटी, शेती शाळा व शेती विषयक प्रशिक्षण, ऍग्रो मार्केट यांसारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा वापर करायला हवा. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता नक्कीच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
शेतीमधील आव्हाने आणि उपाययोजना, कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरास चालना मिळावी यासाठी विद्यापीठांचे प्रयत्न, प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे. धोरणाची दिशा व भविष्यातील योजना याविषयही त्यांनी सादरीकरणातून माहिती दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता व शेती कृषी हॅकेथॉन विजेत्या स्पर्धकांनी केले सादरीकरण
डॉ. शरदचंद्र लोहकरे यांनी दिले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता – शेतीसाठी’ या सादरीकरणात अचूक शेती व्यवस्थापन, वातावरण, पिकांचे विविध रोग याची महिती जमा करून या महितीवर आधारित निर्णय घेण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी व लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी होतो.
आय.आय.टी प्रा. कवी आर्य यांनी यंत्राचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देणाऱ्या उपक्रमाबद्दल सांगितले. शेती करण्यासाठी जर कामगारांची आवश्यकता असेल तर शेतकरी लेबर लिंक या ॲपची मदत घेऊ शकतात. यासोबतच शेतीसाठी अनुकूल असलेले वातावरण, शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी सुद्धा हे ॲप उपयोगी आहे असेही त्यांनी सांगितले.
ऑटोफार्म फार्मटेक प्रा. लि. पुणेचे श्रीलेश मांडे यांनी शेताच्या संपूर्ण ऑटोमेशन बाबत सादरीकरण केले. शेतीचे नियोजन आणि व्यवस्थापन सुलभ करून देण्यासाठी गरजेनुसार ऑटोफार्म आपल्या शेतात लावून देण्यात येतात. पाण्याचे संपूर्ण नियोजन (AutoFarm Irrigation Automation), आपल्या फोनद्वारे पाण्याची मोटर (पंप), पाण्याचे व्हॉल्व्ह, विजेच्या वेळेनुसार पंप चालू-बंद करण्याची सुविधा, सेन्सरद्वारे मातीचा ओलावा, तापमान, वीज वाहकता, हवेचे तापमान, सूर्यप्रकाश, हवेतील आर्द्रता आणि पानांवरील ओलावा इत्यादी माहिती आपल्या फोनवर समजते याबाबत माहिती सादर केली.
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल ते विक्रीपर्यंत मदत करणाऱ्या ॲग्रिबिड ट्रॅकरची माहिती रिया भामरे, अनुश्री जाधव या विद्यार्थ्यीनीनी सादर केली. लेबर लिंक अॅपचे अथर्व ढवळे यांनी शेतीला लागणारे मनुष्यबळ ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी लेबर लिंक अॅप विकसित करत असल्याबद्दल माहिती दिली. या ॲपमध्ये प्लंबर ते शेतीसाठी लागणाऱ्या विविध सेवा याची माहिती उपलब्ध आहे. कष्टकरी राजाचे नवनाथ गरूड यांनी मातीचे संवर्धन आणि उपाय यावर सादरीकरण केले.
डिटेक्ट टू प्रोटेक्टचे अन्वय भोळे, फसलचे अमरिंदर सिंग, ग्रो इंडिगोचे अभियांत्रिकी प्रमुख परीन तुरखिया, पेस्टोसिसचे विनायक पाटील, विलो मॅदर अॅण्ड प्लँट पंप प्रा. लि.चे अजित भारसकर,फायल्लो उत्पादन आणि सेवाचे कैलास भवर यांनी कृषीविषयक माती संवर्धन, कीटक उपाययोजना, हवामान अंदाज, पाणी वापर, विविध कृषी ॲप या विषयी सादरीकरण केले. सूत्रसंचालन कृषी उपसंचालक शिल्पा निखाडे यांनी केले. विभागीय कृषी संचालक बालाजी ताटे यांनी आभार मानले.
०००
संध्या गरवारे/विसंअ/