यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. २७ कोटी रुपये खर्च करून हा भव्य पुल व पोहोच मार्ग साकारण्यात आला आहे.
बोरी येथे झालेल्या लोकार्पणप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा बोंदरे, उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार, जीवन पाटील, बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम पुरकर, तहसीलदार रवि काळे, पराग पिंगळे, यशवंत पवार, बोरीचे सरपंच लक्ष्मण वांजरेकर, उपसरपंच ओमबाबू लढ्ढा, छोटी बोरीचे उपसरपंच सतिश शेटे, मनोज सिंघी, भाऊराव ढवळे, बाळासाहेब दौलतकार, पुलाचे कंत्राटदार अब्रार अहमद आदी उपस्थित होते.
तब्बल २७ कोटी रुपये खर्च करून हा पुल व पोहोच मार्गाचे बांधकाम करण्यात आले आहे. या कामामध्ये मुख्य पुलासह पोहोच मार्गाचा समावेश आहे. पालकमंत्री राठोड यांनी पुलाच्या नामफलकाचे अनावरण व फित कापून उद्घाटन केले. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना प्रतिक्षा असलेला पुल वाहतुकीस खुला झाल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अडान नदीला पूर आल्याने होत असलेली गैरसोय टळण्यासोबतच परिसरातील नागरिकांना वाहतुकीची उत्तम सुविधा निर्माण झाली आहे.
यावेळी पुलाचे कंत्राटदार अब्रार अहमद यांनी पुलाचे काम उत्तमपणे केल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी पुलावरुन चालत पूल व पोहोच मार्गाची पाहणी केली.
०००