महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9 लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. आपण ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि लाभार्थी निवड कशी होणार, याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
मागेल त्याला सौर पंप योजना काय आहे?
शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार 3,5,7.5 अश्वशक्ती (HP) क्षमतेचे पंप दिले जाणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 10% रक्कम, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप किंमतीच्या 5 % रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे.
पैशांच्या स्वरुपात पाहिल्यास साधारणपणे शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम पुढीलप्रमाणे असणार आहे.
3 HP क्षमतेचा पंप – 17,500 ते 18,000 रुपये
5 HP क्षमतेचा पंप – 22,500 रुपये
7 HP क्षमतेचा पंप – 27,000 रुपये
सौर कृषी पंपाची देखभाल व दुरूस्तीचा कालावधी 5 वर्ष राहणार आहे. या कालावधीत सौर कृषी पंप नादुरूस्त झाल्यास विनामुल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकरी जी एजन्सी निवडणार आहे, त्या एजन्सीची राहणार आहे. तसेच, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीत सौर पॅनेलचे नुकसान झाल्यास, त्याची चोरी किंवा तोडफोड झाली तर एजन्सीकडून विम्याचे संरक्षणही मिळणार आहे.
लाभार्थी निवड कशी होणार?
ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्रोत (विहिर, शेततळे, बोअरवेल इ.) उपलब्ध आहे आणि ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपरिक कृषी पंपाकरता वीज पुरवठा देण्यात आला नाही असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप दिले जाणार आहेत. त्यात, 2.5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर 3 HP क्षमतेचा पंप दिला जाईल. 2.5 ते 5 एकरपर्यंत शेतजमीन असेल तर 5 HP क्षमतेचा पंप दिला जाईल. 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर 7.5 HP क्षमतेचा पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार सौर पंप दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या क्षेत्रानुसार सौर पंप दिला जाणार आहे. याशिवाय, वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, विहिर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. तसेच अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज कुठे व कसा करायचा?
मागेल त्याला सौर पंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कधीही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज जवळच्या महावितरणच्या कार्यालयात जाऊन करता येतो. ऑनलाईन अर्ज महावितरणची अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in वर शेतकरी स्वत: करू शकतात.
महावितरणची अधिकृत वेबसाईट
या वेबसाईटवर गेल्यास उजवीकडे ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास नवीन पेज ओपन होईल. उजवीकडे वरती असलेल्या ‘भाषा’ पर्यायावर क्लिक करुन तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता. इथल्या ‘लाभार्थी सुविधा’ पर्यायावर जाऊन ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेसाठीचा अर्ज तुम्हाला दिसेल. यात पुढील माहिती तुम्हाला भरायची आहे.
याआधीची कृषीपंप वीज जोडणी प्रलंबित असेल तर तो तपशील,अर्जदाराचा वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील,अर्जदाराचा रहिवाशी पत्ता व ठिकाण, जलस्रोत आणि सिंचन माहिती, कृषी तपशील, विद्यमान पंप तपशील आवश्यक, तपशील बँक तपशील त्याखाली आलेले घोषणापत्र व्यवस्थित वाचून त्यासमोरील डब्ब्यात बरोबरची टिक करायची आहे.
आवश्यक कागदपत्रे
ही सगळी माहिती भरुन झाली की कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यात, सातबारा उतारा (विहीर/कुपनलिका शेतात असल्यास सातबारा उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र 200 रुपयांच्या मुद्रांक कागदवर. आधारकार्ड प्रत, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, अनुसुचित जाती/जमातीचे प्रमाणपत्र, ही सगळी माहिती भरुन झाली की, ‘अर्ज सादर करा’ या पर्यायावर क्लिक करायचं.
अर्ज केल्यानंतर पुढे काय?
अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर लाभार्थी क्रमांक व इतर तपशील पाठवला जाईल. हा लाभार्थी क्रमांक वापरुन या वेबसाईटवरील अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक केल्यास, तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता. सोबतच, तुम्हाला देय असलेली रक्कम भरू शकता आणि पुरवठादार एजन्सीची निवड करू शकता. एकूण 14 एजन्सीमार्फत ही योजना राबवण्यात येत आहे, त्यापैकी एक एजन्सी तुम्हाला निवडायची आहे. लाभार्थी अर्जदाराने अर्ज केला की तुम्ही निवडलेली एजन्सी आणि महावितरणचे कर्मचारी संयुक्तपणे तुमच्या शेतात करुन माहितीची पडताळणी करतात. सर्व्हे करतात. सर्व माहिती योग्य असेल तर मग तुम्हाला योजनेसाठी पात्र आहात की नाही ते ठरवलं जातं आणि मग सौरपंप इन्स्टॉलेशनचे काम सुरू होते. मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अडचणी आल्यास, सौर कृषी पंप नादुरुस्त झाल्यास, सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास महावितरणचे अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता. ते नंबर असे आहेत…
1912 / 19120 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435
०००
- रणजितसिंह राजपूत जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार