मुंबई, दि. २५ : राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
कोकण किनारपट्टीला आज २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५-३० पासून रात्रौ ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे
पर्यंत ३.५ ते ४.१ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू सातारा जिल्ह्यात वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दिनांक २४ जून २०२५ रोजी रात्री ११.०० वाजल्यापासून ३० हजार ५१३ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू करण्यात आला असून नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जगबुडी नदी इशारा पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर असून नागरीकांना सतर्क करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हयात पाटपन्हाळा, ता. राधानगरी येथे डोंगर उतारावरील माती सरकण्यास सुरवात झाल्यामुळे खबरदारी म्हणून डोंगरापासून २०० मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेतील सर्व वर्ग सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. गाव डोंगरापासून २ किमी अंतरावर असून कोणताही धोका नाही.
पनोरी ते फराळे कारखाना रोड वाहतूक सुरू कोल्हापूर जिल्हयात राधानगरी तालुक्यातील पनोरी ते फराळे कारखाना रोडवर दरड कोसळली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रिकामा केला असून वाहतुक सुरळीत चालू आहे.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२५ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) गडचिरोली जिल्ह्यात ४२.४ मिमी पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ३८.९, चंद्रपूर जिल्ह्यात २२.५ मिमी, अकोला २२.३, आणि रत्नागिरी जिल्ह्यात २१.२ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज २५ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १०, रायगड ८.९, रत्नागिरी २१.२, सिंधुदुर्ग २०.५, पालघर ७.९, नाशिक २.९, धुळे १.७, नंदुरबार १३, जळगाव ३.२, पुणे ६, सोलापूर २.३, सातारा १०.५, सांगली ८.१, कोल्हापूर ३८.९, छत्रपती संभाजीनगर ०.२, लातूर ०.८, धाराशिव ०.८, नांदेड ३.१, परभणी ०.२, हिंगोली १, बुलढाणा ९.५, अकोला २२.३, वाशिम १.७, अमरावती ७.९, यवतमाळ ५.३, वर्धा ३.६, नागपूर ६.१, भंडारा ७.३, गोंदिया ५, चंद्रपूर २२.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात ४२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू, रत्नागिरी जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून एक व्यक्तीचा मृत्यू आणि नाशिक जिल्ह्यात दरड कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
००००
एकनाथ पोवार/विसंअ/