जिल्ह्यात दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – पालक सचिव एकनाथ डवले

नाशिक, दि. १९ : राज्य शासनाने अलीकडेच दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आता शासनाने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. ई – ऑफिस प्रणालीचा वापर करावा, अशा सूचना पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाचा पालक सचिव डवले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालक सचिव डवले यांनी सांगितले की, शासनाच्या शंभर दिवसांच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी भविष्यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्ट्र २०४७ च्या अनुषंगाने व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यात दीर्घकालिन म्हणजे २०४७ पर्यंत गाठावयाची उद्दिष्टे, मध्यमकालिन उद्दिष्टे म्हणजे राज्याच्या अमृत महोत्सवापर्यंत गाठावयाची उद्दिष्टे आणि अल्पकालिन म्हणजे २ ऑक्टोबर २०२९ पर्यंतच्या पाच वर्षांत वर्षनिहाय गाठावयाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. दीडशे दिवसांच्या कार्यक्रमात विकसित महाराष्ट्र २०४७, ई गव्हर्नन्स, सेवाविषयक, प्रशासकीय सुधारणांचाही समावेश आहे. तसेच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा. आगामी काळात शंभर टक्के ई- ऑफिस प्रणालीचा वापर करावा, असेही पालक सचिव श्री. डवले यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी शर्मा यांनी 150 दिवसानिमित जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

या बैठकीनंतर पालक सचिव डवले यांनी नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत त्यांना गती देण्याचे निर्देश दिले. कुंभमेळा प्राधिकरणाच्या सह अध्यक्ष श्रीमती नायर यांनी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

०००