साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

  • मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साहित्यिकांची निवड
  • डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य  अकादमी पुरस्कार जाहिर

नवी दिल्ली, दि. १८: साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ व ‘बाल’  पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रामधून मराठी आणि सिंधी भाषेतील साहित्यकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी झाली आहे. मराठी भाषेसाठी  प्रदीप कोकरे या युवा साहित्यिकाला  ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीसाठी आणि सिंधी भाषेसाठी मंथन बचाणी यांच्या ‘पांधीअड़ो’ या कविता संग्रहाची ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  तर ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कारासाठी बालसाहित्यकार कवी डॉ. सुरेश सावंत यांची त्यांच्या ‘आभाळमाया’ या कविता संग्रहासाठी निवड करण्यात आली आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या वर्ष 2025 साठी ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील एकूण 23 युवा लेखकांची निवड युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली. तर बाल साहित्य अकादमी पुरस्कारासाठी 24 बालसाहित्यकारांची निवडीची आज घोषणा झाली आहे. प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे. ‘युवा’ व ‘बाल’  साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. डोंगरीमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा सध्या करण्यात आलेली नाही.

मराठी साहित्यातील संवेदनशील आणि होतकरू युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला 2025 सालचा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘खोल खोल दुष्काळ डोळे’ ही कादंबरी आधुनिक तरुण पिढीच्या भावविश्वाचे आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचे प्रामाणिक आणि मार्मिक चित्रण करते. मुंबईच्या चाळीतील जीवन, बदलते सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आणि तरुण मनातील भावनिक हुंदके यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाच्या वरवर निरर्थक वाटणाऱ्या कृती हळूहळू चिंतनशील आणि अस्तित्वाच्या शोधाकडे वळतात, ज्यामुळे ही कादंबरी नव्या पिढीचा सशक्त आवाज मानली जाते. प्रदीप कोकरे यांचे लेखन ग्रामीण आणि शहरी जीवनातील बारकावे तसेच आधुनिक तरुणांच्या भावनांचे गहन चित्रण करते. त्यांची साधी पण प्रभावी लेखनशैली वाचकांना अंतर्मुख करते.

युवा पुरस्कारासाठी मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, इंद्रजीत भालेराव व डॉ. रणधीर शिंदे यांचा समावेश होता.

‘पांधीअड़ो’ हा मंथन बचानी यांनी लिहिलेल्या सिंधी कवितांचा संग्रह आहे. मंथन बचानी हे मुंबईचे आहेत. त्यांचा कवितासंग्रह अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी कवीने हे पुस्तक सिंधी, देवनागरी आणि अरबी लिपीमध्ये प्रकाशित केलेले आहे. समकालीन सिंधी अनुभवात रुजलेल्या कार्यालये, प्रेम, निसर्ग, तारुण्य, ओळख आणि सांस्कृतिक संबंध या विषयांचा शोध या कविता संग्रहात बचानी यांनी घेतला आहे.

डॉ. सुरेश सावंत हे मराठीतील ज्येष्‍ठ बाल साहित्यकार आणि कवी  असून,  त्यांच्या  ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहास  2025 सालचा मराठी भाषेसाठीचा बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.   डॉ. सावंत यांच्या लेखनाची भाषा अत्यंत साधी, भावपूर्ण आणि कल्पनाशील असून ती मुलांना सहज समजणारी आहे. त्यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहातील रचना मुलांच्या कल्पनाविश्वाला साद घालणाऱ्या आहेत. निसर्ग, आकाश, स्वप्ने आणि बालमनाच्या भावविश्वाशी निगडित असलेल्या या कविता मुलांना आनंद, समज, आणि सौंदर्यदृष्टी देतात. त्यांच्या कविता लयबद्ध व सहज असून त्यामुळे त्या मुलांना आवडतात आणि आठवतात.

डॉ. सावंत हे केवळ कवी नाहीत, तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्य संशोधकही आहेत. त्यांनी ‘बालसाहित्याचा इतिहास’, ‘आंबेडकरी साहित्य’, ‘समाजपरिवर्तनाचे साहित्य’ अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या ‘नंदादीप’, ‘टिंबूपट’ यांसारख्या पुस्तकांनी वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

बालसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाला अनुषंगाने हाताळत त्यांनी अनेक ग्रंथांचे संपादन आणि संशोधनपर लेखन केले आहे. विद्यापीठ पातळीवरही त्यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या ‘आमच्यामया’ या कादंबरीने बालवाचकांमध्ये नवदृष्टीकोन विकसित केला आहे.

बाल पुरस्कारासाठी मराठी भाषेतील  निवड साहित्य मंडळामध्ये एकनाथ आव्हाड, सोनाली नवांगुळ आणि लक्ष्मण कडू यांचा समावेश होता.

०००

अंजू निमसरकर – माहिती अधिकारी