दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येणार – मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १८ : दिव्यांगांना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने विविध उपक्रम राबवित असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कालसुसंगत व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले, व्हॉट्सॲप चॅटबॉट, ई-ऑफिस आदी तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांगांना शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून द्याव्यात. ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ हे अभियान उर्वरित जिल्ह्यात राबविण्यात यावे. जिल्हास्तरावर दिव्यांगाचे सर्वेक्षण करण्यात यावे. दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत एक टक्का निधी राखीव आहे, या निधीमधून दिव्यांग व्यक्तीसाठीच्या योजना राबविण्याबाबत पालकमंत्र्यांना पत्र देण्यात यावे. स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य, सुगम पायाभूत सुविधा, कौशल्य प्रशिक्षण यासारख्या योजनांचा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

०००

शैलजा पाटील/विसंअ/