विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळा, गावाचे नाव उज्ज्वल करावे – पालकमंत्री अतुल सावे

  • जिल्हा परिषद व सर्व शासकीय शाळांचे बळकटीकरण करणार
  • आता पहिलीपासून सीबीएससी पॅटर्नच्या माध्यमातून शिक्षण

 नांदेड, दि. १६: आज शाळेचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. या दिवशी मुलांचा उत्साह वाढावा, म्हणून राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या तसेच इतर शालेय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले आहे. यावेळी मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे पालक, विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा संदेश दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच उत्कृष्ट कार्यातून देशाचे, गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय शाळा बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पालक, शिक्षकांचे आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत केले. पहिल्या दिवशी सर्वजण उत्साहात शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करु या. या वर्षभरात आपण सर्वजण शाळेत उपस्थित राहू या. प्रत्येक नागरिक व विद्यार्थी शिकला पाहिजे असा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आपण सर्वानी मिळून त्यांचा हा संकल्प पूर्ण करु या, असेही आवाहन त्यांनी केले.

आजपासून सर्व शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या निर्णयानुसार सर्व जिल्हा परिषद शाळांमधून सीबीएससी पॅटर्न प्रमाणे शिक्षण मिळणार आहे. शासनाच्यावतीने सर्व शाळामध्ये डिजीटलायझेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेही पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावले जात आहेत. शिक्षकांनी जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत त्यांना इतर विद्यार्थ्यांसोबत आणण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली पाहिजे. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल तर त्याचे पालकांशी चर्चा करुन शिक्षकांनी संवाद साधला पाहिजे, यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या पुढील काळात चांगले काम होईल. आज विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

०००