सरकार नोंद असलेल्या गावठाणांचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 14 :  कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाणाचा प्रश्न सोडवण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी, सुपने, केसे गावातील सरकार नोंद असलेल्या गावठाण संदर्भातील बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  बैठकीस  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण,  कराड उपविभागाचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे,  कराड तहसीलदार कल्पना ढवळे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव, कराडचे गट विकास अधिकारी प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

कराड तालुक्यातील साजूर, साकुर्डी सुपने, केसे गावातील संबंधित लोकांच्या गावठाणांचा प्रश्न हा खूप वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत  प्रस्ताव पाठवून शासन स्तरावर सादर केला जाईल. शासन स्तरावर बैठक घेऊन याला शासन मान्यता  घेण्यासाठी प्रयत्न करेन. यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी सविस्तर प्रस्ताव पाठवावा.   गावठाणाचा प्रश्न प्रलंबित असलेल्या नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

यावेळी संबंधित नागरिकांना येणाऱ्या  अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या.

गावठाण नोंदीची अडचण असलेल्या संबंधित लोकांच्या जमिनी कोयना धरणाच्या नदीकाठावरील व भूकंपग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी वसवण्यासाठी ग्राम कमिटीद्वारे खाजगी क्षेत्रातील जमिनी संपादन करून पुनर्वसन केले आहे.  आज घडीला काही जमिनीवर मूळ शेतकऱ्यांची नोंद तर काही जमिनीवर सरकार म्हणून नोंद असल्याबाबत माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

बैठकीस  संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

000