प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई,दि.७ :  प्रत्येक व्यक्तीला निरोगी  आयुष्य जगण्यासाठी चांगल्या आहाराची आवश्यकता असते.सुरक्षित अन्न व औषध प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज आहे.विभागात  १९४ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदभरती झाल्याने या विभागातील  कामकाज अधिक गतीने होईल असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले.

‘जागतिक अन्न सुरक्षा दिन- २०२५’ या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विशेष राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, आमदार कालिदास कोळंबकर, सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, आहारतज्ज्ञ जगन्नाथ दीक्षित,पाककृती तज्ज्ञ विष्णू मनोहर उपस्थित होते.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की,जागतिक आरोग्य संघटनेने “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेवर आधारित जागतिक अन्न सुरक्षा दिन – २०२५ ची संकल्पना घेतली आहे.या संकल्पनेचे महत्व असे आहे की शेतापासून ते थेट आपल्या जेवणाच्या ताटापर्यंत अन्न सुरक्षित ठेवण्यामध्ये विज्ञानाचा आधार घेवून हे काम अधिक गतीमान करता येईल.एखादी व्यक्ती आजारी पडली की औषध वेळेवर खाते मात्र आजारीच पडू नये म्हणून योग्य आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. योग्य अन्न खाणे खूप महत्वाचे आहे.त्यामुळे अन्न सुरक्षितता जनजागृती खूप महत्वाची आहे. आपण खाल्लेल्या अन्नाबद्दल अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की,ज्या अधिका-यांचा उत्कृष्ठ कामासाठी सत्कार करण्यात आला त्यांनी देखील आपल्या सहका-यांना मार्गदर्शन करावे.तसेच विभागाचे धोरण ठरविण्यासाठी सर्वांनी आपली मते विभागाला कळवावीत.अन्न व औषध प्रशासन विभागाने निकृष्ट दर्जाच्या,बनावट,भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थ आणि औषध उत्पादनांची विक्री रोखण्याचे काम करावे असेही ते म्हणाले.

कामाची विश्वासार्हता व गतीमानता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक -राज्यमंत्री योगेश कदम

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, अन्न व औषध  प्रशासन विभागाने आपली कार्यपद्धती अधिक पारदर्शक, प्रभावी आणि विश्वासार्ह करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे.अन्न व औषध विभागामार्फत जे इन्स्पेक्शन करणार आहोत, त्याचे संकलन आणि विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने व्हायला हवे. त्यामुळे कार्यपद्धती जलद, अचूक आणि डेटा आधारित होईल,” असे मंत्री श्री. कदम यांनी सांगितले. अन्न संरक्षण अधिकारी प्रमाणेच  ड्रग इन्स्पेक्टर पदासाठी  भरती लवकरच करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

या कार्यक्रमात Food Safety: Science in Action या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. तसेच यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व संस्थांचा सत्कार करण्यात आला.   कार्यक्रमात अन्न व्यवसायिक प्रतिनिधी  डॉ. प्रबोध हळदे, बीजे मेडीकल कॉलेजचे विभागप्रमुख तथा आहारतज्ज्ञ जगन्नाथ दिक्षीत,प्रख्यात पाककृती तज्ज्ञ विष्णु मनोहर यांनी मार्गदर्शन केले. तसेच अन्न व्यावसायिकांना, अन्न अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले. नव्याने नियुक्त झालेल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मंत्री श्री. झिरवाळ व राज्यमंत्री श्री. कदम यांच्या हस्ते नियुक्तपत्र प्रदान करण्यात आले. राखी तांबट यांनी सूत्रसंचालन केले.