प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.१ : राज्य शासनाकडून समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रशासनाने योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून त्यांचा पात्र नागरिकांना  लाभ देतांना त्यांच्या यासंदर्भातील समस्याही तत्परतेने सोडवाव्यात, असे आदेश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात अधिकाऱ्यांना दिले.

येथील नियोजन भवनात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात एकूण 207 नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदने सादर केली. प्रशासनातील विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

नागरिकांच्या स्थानिक स्तरावरील समस्यांचे तात्काळ निराकरण व्हावे व त्यांचे शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लागावे, यासाठी  पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थी, दिव्यांग, महिला, वृद्ध  तसेच समाजाच्या सर्व घटकातील नागरिकांनी आज व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या समस्या सादर केल्या. समस्याग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या तक्रारींवर तात्काळ  कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले. विशेषतः आरोग्यविषयक समस्यांवर आज प्राप्त झालेल्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत त्यांनी सांगितले.

नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित व नियमानुसार करता येणारी कामे दिरंगाई न करता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश  पालकमंत्र्यांनी शासकीय विभागांना दिले. आजची सर्व निवेदने, समस्या व इतर प्रकरणांविषयी संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा पुढील वेळी घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

योजनांचा लाभ देण्यात येणारे अडथळे, आरोग्यविषयक सुविधा, अतिक्रमण, अंगणवाडी व परिचारिकांच्या समस्या, वीज वितरण, कृषी, क्रीडा व महसूल संबंधित अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदने देवून श्री. बावनकुळे यांच्याशी संवाद साधला. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000