शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत देणार – सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ

जिल्ह्यातील मंदिर विकास आराखड्यांसह नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास कामांचा आढावा

कोल्हापूर, दि. ३१ : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू असून, येत्या काळात शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत वेळेत दिली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य तथा सह पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा माधुरीताई मिसाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांनी त्यांच्या कार्यभाराखालील विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी सह पालकमंत्री म्हणाल्या, श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासह श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना त्या ठिकाणी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना पुनर्वसनाबाबत जी काही भीती आहे, त्याबाबत प्रशासन नेमके काय करणार आहे, याबाबतची माहिती द्या. त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर होऊन आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ते सहकार्य करतील. श्री अंबाबाई मंदिराबाबत मागील दोन भेटीदरम्यान विविध कामांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासह विविध कामांचा समावेश करून तयार केलेल्या मंदिर विकास आराखड्यात अजून शंभर कोटी रुपयांच्या कामांचा अंतर्भाव केल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. संबंधित व्यावसायिकांबरोबर येत्या काळात बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाबाबतची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या हद्दवाढीबाबतही सह पालकमंत्री यांनी आजूबाजूच्या गावांमधून प्राधान्याने काही निवडक गावांचा समावेश करून त्या गावांसाठी महानगरपालिका कोणत्या सुविधा देत आहे आणि देणार आहे, याबाबत माहिती देऊन इतर गावांपुढे एक चांगले उदाहरण निर्माण करा, यामुळे आजूबाजूच्या गावांमधील हद्दवाढीबाबतचे गैरसमज दूर करता येतील, अशा सूचना त्यांनी केल्या. कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या आतील गावांचा हद्द वाढीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगून यातील दहा गावे शहरात एकरूप झाल्याचे सांगितले. याचबरोबर शहरातील रस्त्यांसाठी मागणी केलेला उर्वरित निधीही मिळावा, अशी मागणी सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे केली.
आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिके अंतर्गत रवींद्रनाथ टागोर वाचनालयासाठी आवश्यक निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच त्यांनी इचलकरंजी शहरातील एचपीसीएल गॅस पाईपलाईनसाठी तीन टप्प्यांमध्ये खोदाई झाली असल्याचे सांगून यामध्ये महानगरपालिकेला देय महसूल संबंधित कंपनीकडून मिळाला नसल्याचे सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवश्यक देय महसुलाबाबतची माहिती तयार करून एचपीसीएलला देण्यास सांगितले जाईल असे सांगून लवकरच याबाबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीत परिवहन विभागाकडील एचएसआरपीए नंबर प्लेटबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांनी नागरिकांच्या तक्रारी सोडवून फसवणूक करणाऱ्या पुरवठादार तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील खाजगी वाहतूक करणाऱ्या बसेस तसेच इतर वाहनांमुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी गर्दी होते, तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा नाहीत याबाबत तक्रारी असून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह महानगरपालिकेने खाजगी वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना राबवून प्रवाशांचे प्रश्न सोडवावेत, अशा त्यांनी आरटीओ संजीव भोर यांना सूचना केल्या.
तसेच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक बसेसची मागणी असल्यास त्वरित प्रस्ताव देण्यात यावा, अशा सूचना केल्या. तसेच प्रत्येक एसटी स्टँडमधील स्वच्छतागृहांची व्यवस्था चांगली असल्याची खात्री करून आवश्यक दुरुस्त्या करण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांना सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा मंडळातील ३१ वर्षांच्या सेवेबद्दल सन्मान सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेसह इचलकरंजी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबतचा आढावा सह पालकमंत्री मिसाळ यांनी घेतला. यावेळी त्यांनी सांगितले, दरवर्षी पावसाळा येण्याआधी नालेसफाईसह इतर अनेक प्रकारची कामे केली जातात. या काळात धावपळ करून कामे करण्यापेक्षा वर्षातील इतर कालावधीतही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शाश्वत तयारी केली जावी.
भेटीदरम्यान सहपालकमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी अंबाबाई मंदिरात आणि जोतिबा मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून विकास आराखड्याचा अनुषंगाने माहिती जाणून घेतली.

००००००