रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेऊन नियोजन करावे. तसेच योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बेालत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.  श्री गोगावले पुढे म्हणाले की,  रोजगार हमी योजना विभागामार्फत जिल्ह्यात कामांची संख्या वाढविणे  आवश्यक आहे.  फलोत्पादन विभागांच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करुन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. गट विकास अधिकाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे. बांबु लागवडीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने बांबू लागवडीला देखील प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

000000