रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 773

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका):- राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास भेट देऊन निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

             जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महावितरणचे सहा. व्यवस्थापक राहुल गुप्ता,  पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विविध नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

            बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यात ३०८५ मतदान केंद्र असून त्यात जालना लोकसभा मतदार संघाचा भाग असलेले १०४५ मतदान केंद्र हे ६१८ ठिकाणी आहेत. १९- औरंगाबाद मतदार संघात २०४० मतदान केंद्र ९७६ ठिकाणी आहेत.  जिल्ह्यात ३० लाख ६७ हजार७०७ मतदार आहेत. त्यात जालना मतदार संघात १० लाख ६,४८७ तर औरंगाबाद मतदार संघात २० लाख ६१ हजार २२० मतदार आहेत. जिल्ह्याला ६१२० मतदान यंत्रे, २०४० कंट्रोल युनिट, २०४० व्हिव्हिपॅटची आवश्यकता आहे. ते सर्व उपलब्ध असून  सद्यस्थितीत ७३४१ मतदान यंत्रे उपलब्ध आहेत. २४४५ कंट्रोल युनिट व २६४९ व्हिव्हिपॅट उपलब्ध आहेत. त्यातील उर्वरित यंत्रे ही राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार ७४० मनुष्य बळाची गरज असून २० हजार ५२४  कर्मचारी प्रशिक्षण घेऊन सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात आली.

            बैठकीस मार्गदर्शन करतांना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानाच्या वेळी मतदारांना कुठल्याही प्रकारे समस्या जाणवू नयेत, यासाठी योग्य नियोजन करावे. सर्व यंत्रणेने दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. वृद्ध, दिव्यांग यांची मतदानाच्या वेळी काळजी घ्यावी, त्यांना विनात्रास मतदान करता यावे, याची दक्षता घ्यावी. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  तसेच अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे अहवाल वेळेवर पाठवावेत. मतदान प्रक्रियेत अडथळा आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्या असे निर्देश त्यांनी दिले.

००००००

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ११ : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ एनआरआय मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.

*****

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट

मुंबई, दि.11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यात नंदुरबार मतदारसंघामधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, जळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, औरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, मावळमधील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, पुणेमधील 2018 मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, अहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.

राज्यातील चौथ्या टप्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथके, स्थीर सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्य, ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदारांनी मतदान करावे यासंदर्भात जागृतीही करण्यात येत असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

 

पवन राठोड/ससं

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

मुंबई, दि. 11 – राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक अधिकारी/ निवडणूक निर्णय अधिकारी/ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात राजकीय पक्षांच्या/ उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचे पालन करण्याची विनंती केलेली आहे. आदर्श आचार संहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयोगाकडून जिल्हा व राज्यस्तरावरील समाज माध्यमांमधून वेळोवेळी आदर्श आचार संहितेची माहिती लोकांना देण्यात आलेली आहे.

लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर आयोगाचे बारकाईने लक्ष आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून गुन्हे दाखल होऊन त्यावर कार्यवाही होत आहे. राज्यामध्ये यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीशी संबंधित दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये निवडणुकी संदर्भात लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 211 तर समाज माध्यमांवरील खोट्या बातम्यांशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये 22 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

****

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

मुंबई, दि.11 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. 17 मे, 2024 आणि शनिवार दि.18 मे, 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी श्री.यादव यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.17 मे 2024 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास दि.31 मे,2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

0000000

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. 11 (जिमाका) : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना दिला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मुख्य रस्त्यावर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरूवात केली.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे असे आवाहन ठामपा सौरव राव यांनी उपस्थित मतदारांना केले.

रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक कर्मचा-यांनी धावपटू मतदारासोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. तसेच स्वीपच्या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. मी मतदान करणारंच… आपण ही मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचा मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असलेले माहितीपत्रकाचे वाटपही उपस्थित धावपटू मतदार व नागरीकांना करण्यात आले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदार जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन रन फॉर वोट’ मिनी मॅरेथॉन मध्ये सहभागी असलेल्या सर्व नागरिकांना १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मार्फत करण्यात आले.

00000

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे दि 10 (जिमाका ) – लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी  आज (10 मे) ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

सदर हिरानंदानी इस्टेट परीसरात १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मधील कर्मचारी मोठ्या उत्साहात मॅस्कॉट या मनोरंजक कार्टून पात्राला सोबत घेऊन मतदान करा,मतदान करा लोकशाहीचा विजय करा आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो या घोषणा मोठ्या आवाजात देऊन व हातात मतदान जनजागृतीचे संदेश यावेळी नागरिकांनी दिले.

संपूर्ण हिरानंदानी इस्टेट परीसरात मॅस्कॉटच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.

रस्त्याच्या दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली.. रॅलीमधील मॅस्कॉट सोबत स्वीप कर्मचारी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता.

मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप मॅस्कॉटच्या हस्ते सर्व नागरिकांना करण्यात आले आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी त्याचप्रमाणे मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहान सर्व नागरिकांना करण्यात आले.

0000

 

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६२ तर ३८ दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली असून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील एकूण 262 नागरिकांनी तर 38 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली.            

 40 टक्के अपंगत्व (Locomotive) 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरुन दिले त्यापैकी पात्र मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

25-ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या गृह मतदानाची आकडेवारी – 145 मिरा-भाईंदर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-34, दिव्यांग मतदार-3 ) 146 ओवळा माजिवडा (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-46, दिव्यांग मतदार-16 ), 147 कोपरी पाचपाखाडी (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-22, दिव्यांग मतदार-4 ) 148 ठाणे (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-103, दिव्यांग मतदार-2 ), 150 ऐरोली (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-18, दिव्यांग मतदार-4 ) 151 बेलापूर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-39, दिव्यांग मतदार-9)

          ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ८५+ वर्षावरील 27 हजार 325 मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृध्दत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.

            ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 07 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या- 15 हजार 21, महिला मतदारांची संख्या- 12 हजार 304 इतकी आहे. ज्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना अर्ज भरुन दिले आहेत, त्या मतदारांचे गृहमतदान करुन घेतले जाणार असल्याचे 25-ठाणे लोकसभा मतदार संघाच्यानिवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी नमूद केले.

00000

 

 

भिवंडीतील प्रभाग समिती परिसरात वासुदेवाच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी  स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 3 परिसरात मतदानाचे प्रमाण कमी असून येथील नागरिकांनी मतदान करावे यासाठी याठिकाणी आज वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

स्वीप उपक्रमांतर्गत भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 3 परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून वासुदेवाने नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. लोकशाही बळकटीकरणासाठी आपल्या प्रत्येकाचे मत आवश्यक असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. आपले मत अमूल्य आहे, ते वाया घालवू नका असा संदेश नागरिकांना वासुदेवाने दिला.

यावेळी मतदानाबाबत जनजागृतीपर संदेश देणारे फलक घेवून जनजागृती करण्यात आली. वासुदेवाला पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावेळी आम्ही मतदान करणार.. अशा घोषणा दिल्या. 20 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवा, आपणही मतदान करा आणि  आपल्या आजबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन करण्यात आले.

00000

 

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...