रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 1183

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १४ सप्टेंबर तर ‘दिलखुलास’ मध्ये १४, १५ आणि १६ सप्टेंबर रोजी पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत

मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी पर्यटन संचालनालयाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. पर्यटन स्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचावी यासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्यात येत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, सण, उत्सव, भाषा, परंपरा जगभरात पोहोचावी यादृष्टीने परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यटनस्थळी कोणत्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण याबाबत डॉ. पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.४० ते ७.५५ या वेळेत तर, शुक्रवार दि. १५ आणि शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. १४ सप्टेंबर, २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मॉरिशसला प्रयाण

मुंबई, दि. १३ : मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जगन्नाथ यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत आगमन झाले होते. एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुंबई भेटीनंतर मॉरिशसचे प्रधानमंत्री श्री. जगन्नाथ यांचे आज पहाटे मॉरिशसकडे प्रयाण झाले.

मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. अतिरिक्त पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी विमानतळावर उपस्थित होते.

०००

‘मृदसंधारण उपाययोजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

विशेष वृत्त 

मुंबई, दि. 13 : ‘मृदसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- व डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु. २८,०००/-  मापदंड निश्चितीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

या योजनेचा उद्देश राज्यातील अपूर्ण पाणलोट गतिमान पद्धतीने पूर्ण करणे हा असून प्रत्येक तालुक्यातील ५०० ते १००० हेक्टरचे अपूर्ण पाणलोट निवडून ते प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेतून सलग समतल चर, ढाळीचे बांध, कम्पार्टमेंट बंडींग, मजगी शेततळे, जुनी भातशेती दुरुस्ती,  बोडी दुरुस्ती व नूतनीकरण इत्यादी क्षेत्र उपचाराची कामे केली जातात. तसेच, नाला उपचारांतर्गत  माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, वळण बंधारे, अनघड दगडी बांध (लुबो), अस्तित्वातील सिमेंट नाला बांधचे खोलीकरण करणे व खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध इत्यादी कामे केली जातात.

महाराष्ट्रात एकूण जीएसडीएचे 1531 मेगा पाणलोट आहेत. 57849 सूक्ष्म पाणलोट असून त्यापैकी 44185 सुक्ष्म पाणलोट मृद संधारणाचे कामासाठी योग्य आहेत. विविध योजनांतर्गत 41962 पाणलोटांना मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी 38220 सूक्ष्म पाणलोट पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मंत्री श्री. राठोड यांनी दिली.

मृद व जलसंधारणाची कामे मृद संधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास योजनेंतर्गत डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.22,०००/- व इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.12,०००/- असे सध्याचे मापदंड आहेत.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन विकास घटक २.० च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२८,०००/- व इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- मापदंड निश्चित केलेले आहेत.  त्या धर्तीवर मृद संधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्याकरिता, डोंगराळ क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२८,०००/-  व इतर क्षेत्रासाठी प्रती हेक्टर रु.२२,०००/- मापदंड निश्चितीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नवीन निकषानुसार कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री. राठोड यांनी दिले आहेत.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहू नयेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 : “राज्यातील महत्त्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित  राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत पुण्यासह राज्यातील महत्वाच्या विकासप्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विकासप्रकल्पांना आवश्यकतेनुसार राज्य आणि केंद्र शासनाची मंजूरी मिळविणे, निविदा प्रक्रिया गतिमान करणे, विकासकामांच्या आड येणारी अतिक्रमणे तातडीने हटवणे, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करणे, प्रशासकीय तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडथळे दूर करणे आदी बाबी प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणे मेट्रो रेल्वेच्या तिन्ही प्रकल्पांची कामे वेगाने सुरु आहेत. पुणे बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पुणे नाशिक हायस्पिड रेल्वेच्या कामाने वेग घेतला आहे. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम वर्षभरात पूर्ण होईल. अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामांसाठी टेंडरप्रक्रिया सुरु झाली आहे. वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकाचे कामही मार्गी लागले आहे. ‘सारथी’ संस्थेचे कामकाज अधिक व्यापक, गतिमान करण्यासाठी ‘सारथी’चे पुण्यातील मुख्यालय, औंध, कोल्हापूर, नाशिक, नागपूर येथील विभागीय केंद्रांची बांधकामे वेळेत पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. राज्यातील विकासकामांची ही गती अशीच कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे तसेच मुंबईतील जीएसटी भवन, कोकणातील 93 पर्यटन केंद्रांना जोडणाऱ्या कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, पंढरपूर शहर आणि विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदीं विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग किनाऱ्यालगतच गेला पाहिजे, अशी सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली.

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासियांसाठी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका सुस्थितीत करण्यात आल्याने, उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त करुन मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम लवकर पूर्ण होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय, सहकार्य ठेवून राज्यातील पायाभूत आणि विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करणं हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्याअनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मंत्रालयात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत  दिले.

बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (व्हीसीद्वारे), वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव आश्विनी जोशी, पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील, पुणे विभागीय आयुक्त, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पुणे मेट्रो, पीएमआरडीए, तसेच संबंधित जिल्ह्यांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.

००००

नंदुरबार जिल्ह्याच्या याहा मोगी माता बियाणे संवर्धन समितीला राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

नवी दिल्ली, 12 : हरणखुरी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीला ‘राष्ट्रीय वनस्पती जनुक संवर्धक समुदाय पुरस्काराने, राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गौरविण्यात आले.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये जागतिक अन्न व कृषी संस्था आणि भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत आयोजित ‘कृषी जैवविविधता आणि शेतकरी हक्क’ Global Symposium on Farmers’ Rights’ (GSFR) या पहिल्या जागतिक परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीस हा पुरस्कार वर्ष 2020-21 साठी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सविता नाना पावरा आणि मोचडा भामटा पावरा यांनी स्वीकारला. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ही समिती बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे.

12 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीदरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील 59 देशांमधून शास्त्रज्ञ आणि संसाधन व्यक्ती सहभागी होतील. या सत्रादरम्यान स्थानिक आणि स्थानिक समुदाय आणि जगातील सर्व प्रदेशातील शेतकऱ्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना पुरस्कृत कसे करावे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले जातील.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी, कृषी विभागाचे सचिव मनोज आहुजा , वनस्पती वाणांचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहापात्रा, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. हिमांशू पाठक (DARE) आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते नव्याने बांधण्यात आलेले, ‘प्लांट अथॉरिटी भवन’ पीपीव्हीएफआर प्राधिकरणाचे कार्यालय, आणि ऑनलाइन वनस्पती विविधता ‘नोंदणी पोर्टल’चे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीची माहिती

धडगाव तालुक्यात ‘बाएफ’ संस्थेमार्फत २०१० पासून  सुरु असलेल्या स्थानिक जैवविविधता  संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या याहामोगी माता बियाणे संवर्धन समितीमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. लोक सहभागातून पिकांच्या स्थानिक वाणांचे संवर्धन, उत्पादन आणि प्रसाराचे काम सुरू झाले. या माध्यमातून मका, ज्वारी, भरड धान्य पिके, कडधान्यांच्या शंभराहून अधिक वाणांचे संवर्धन, अभ्यास आणि लागवड केली जाते. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील 15 गावांमध्ये मका, ज्वारी, कडधान्ये, तेलबिया आणि भाजीपाला पिकांच्या १०८ स्थानिक पीक वाणांचे संवर्धन आणि बियाणे उत्पादन केले जाते. हरणखुरी, चोंदवडे गावात दोन सामूहिक बियाणे बॅंकामार्फत मका, ज्वारी आदी पिकांचे २५ टन बियाणे उत्पादन आणि १७० टन धान्य उत्पादन आणि विक्री करण्यात आली आहे. तसेच ज्वारीच्या जवळ – जवळ 19 जाती  शोधून काढल्या आहेत. त्यांचे शुध्दीकरणाचे काम केले असून यापैकी पाच जाती पीक वाण संवर्धन आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत करुन घेण्यात आल्या आहेत.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 170, दि.12.09.2023

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 12 : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन संदर्भात कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, मुंबई, गडचिरोली, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड या विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे महत्वाचे आहे. परंतु, काही महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन केले जात नाही. याबाबत संबंधित विद्यापीठांनी नॅक मूल्यांकनासाठी स्थानिक पातळीवर अशा महाविद्यालयांच्या काय अडचणी आहेत, याबाबत पडताळणी करावी आणि नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया रोखणे, महाविद्यालयांची संलग्नता रद्द करणे अशी कारवाई सुरू करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

नॅक मूल्यांकनाच्या प्रक्रियेत बदल करून ही प्रक्रिया सहज, सुलभ व्हावी त्यामुळे ग्रामीण भागातील महाविद्यालय नॅक मूल्यांकनसाठी पुढे येतील, असे बैठकीत कुलगुरू यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत कळविण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

            मुंबई, दि. १२ : राज्य शासनाने १९ सप्टेंबरपासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख एवढ्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

            स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकाधिक नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. 

000

दीपक चव्हाण/विसंअ/

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आठही जिल्ह्यांत विविध कार्यक्रम

मुंबई, दि. 12 : मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या संदर्भातील तयारीचा आढावा घेतला.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याचा तो इतिहास पुन्हा नव्या पिढीला कळावा, त्याकाळी निजामाविरुद्ध दिलेल्या लढ्यातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा, विविध कार्यक्रमांचे नियोजन करुन आठही जिल्ह्यांत ते आयोजित करावेत याबाबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आठही जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती संबंधित अधिकारी यांच्याकडून घेतली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजनही औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे करण्यात येणार आहे. याशिवाय, मुक्तीसंग्रामाचा इतिहास, तेथील हुतात्म्यांचे स्मरण, स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव, आझादी दौड, प्रदर्शन, व्याख्यानमाला, असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठही जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी व्हावा, मुक्तीसंग्रामातून मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे मोल त्याला कळावे, यासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आठही जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा पोहोचावा, यासाठी त्यांनी सूचना दिल्या. प्रधान सचिव श्री. खारगे यांनीही संबंधित जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधून तेथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्यांना सूचना केल्या. दिनांक 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत आठही जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. काही जिल्ह्यात यानिमित्त सप्ताहाभर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

‘वृद्ध मित्र’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम व्हावा -राज्यपाल रमेश बैस

            पुणे दि. १२: वृद्ध नागरिकांचे जीवन अधिक सुखद व्हावे आणि सामाजिक व आर्थिक आव्हानांना सहजपणे तोंड देता यावे यासाठी ‘वृद्ध मित्र’ सारख्या दूरदृष्टीने राबविलेल्या अभिनव उपक्रमांची आवश्यकता आहे. सर्वांनी मिळून या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक उपक्रम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            सोसाइटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरिएंटेड ऑपरेशनल लिंक्स (स्कूल) द्वारा आयोजित ‘वृद्ध मित्र’ कार्यक्रमाच्या शहरस्तरावरील विस्तार कार्यक्रमाच्या उद्घाघटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, ‘स्कूल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बेनझीर पाटील आदी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री.बैस म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे वयासोबत येणारे अनुभव आणि ज्ञानाचे भांडार आहेत. समाजावर त्यांचे असलेले ऋण लक्षात घेता ते आदर आणि सन्मानास पात्र आहेत. देशात २०५० पर्यंत वृद्धांची संख्या ३१ कोटीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. वृद्ध साधारणत: अर्थार्जनाचे काम करत नसल्याने त्यांना गंभीर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे ओझे म्हणून पाहणे किंवा त्यांची कुटुंबात होणारी उपेक्षा ही वेदनादायी असते.

            पारंपरिक कुटुंब पद्धतीतील बदलामुळे येणारी सामाजिक सुरक्षेची कमतरता आणि एकटेपणाच्या भावनेने ही समस्या अधिक वाढते. पेन्शन घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पौष्टिक आहार, आरोग्यसेवा, औषधे घेण्याची समस्या त्यांच्यासमोर असते. अशावेळी त्यांना समाजाकडून प्रेमाची आणि सहकार्याची आवश्यकता असते. हे कार्य ‘वृद्ध मित्र’ सारख्या संस्था करीत आहेत. अशा प्रकारच्या प्रयत्नांची गरज प्रत्येक स्तरावर आहे, असे राज्यपाल म्हणाले.

            समाजातील वृद्ध व्यक्तींना जीवनाच्या या टप्प्यावर भावनात्मक, सामाजिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता असते. त्यादृष्टीने ‘वृद्ध मित्र’ हा ‘स्कूल’ संस्थेचा अभिनव उपक्रम आहे. वृद्धांच्या घरी जावून आवश्यक सेवा देणे ही सर्वोच्च सेवा आहे. प्रत्येक रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र युनिट असणे, त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ही आजची गरज आहे. यासोबतच घरातील वृद्ध हे ओझे नाही तर आशीर्वाद आहे हे तरुणांनी समजून घेण्याचीही गरज आहे.

            गृहनिर्माण संस्थांमध्ये वृद्ध व्यक्तींची देखभाल करण्यासाठी सदस्यांनी पुढाकार घ्यायला हवा. स्कूलसारख्या संस्थांनी शासनाकडे वृद्ध व्यक्तींसाठी धोरण जाहीर करण्यासाठी आग्रह धरावा. पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू करण्यात येत असलेला ‘वृद्ध मित्र’ हा अभिनव उपक्रम सर्व ठिकाणी राबविला जावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री.बैस यांनी व्यक्त केली.

            मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि पुणे शहराला वृद्ध व्यक्तींसाठी अनुकूल शहर बनविण्याचा ‘स्कूल’ संस्थेचा प्रयत्न आहे. महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून इतरही रुग्णालयात ‘स्कूल’च्या सहकार्याने असा कक्ष सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

            संस्थेच्या अध्यक्षा डॉ. बेनजीर पाटील म्हणाल्या, वृद्धांना सन्मानजनक, अनुकूल जीवन जगता यावे यासाठी संस्था काम करीत आहे. २८ हजार वृद्धांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे. यातील ८ टक्के वृद्ध एकटे रहात आहेत. उपक्रमांतर्गत वृद्धांना विविध सुविधा दिल्या जातात. विविध सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवकांचे यासाठी सहकार्य मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

            राज्यपाल महोदयांच्या हस्ते ‘वृद्ध मित्र’ उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या संस्थांचा आणि व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

                                                                        0000

तरुणांना कौशल्यविषयक शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे-राज्यपाल रमेश बैस

पुणे, दि.१२: तरुणांना विविध भाषा शिकवितानाच रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कौशल्य विषयक शिक्षण देण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्यासह त्यांचा जीवनस्तर उंचावेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारक समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘पुनरुत्थान गुरुकुलम्’च्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह मिलिंद देशपांडे, सचिव सतीश गोरडे उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, भारत सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. तरुण कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेले देश मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतासाठी ही सुवर्णसंधी असून त्यासाठी आपल्या युवा लोकसंख्येला कौशल्याचे शिक्षण उपयुक्त ठरेल.

स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेल्या आदिवासी बांधवांनी येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्यात पुढाकार घेतला होता. आदिवासी जमातींच्या हक्कांना राज्यघटनेद्वारे संरक्षित करण्यात आले आहे. या समाजाला शिक्षीत करुन त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही श्री. बैस म्हणाले.

‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’च्या माध्यमातून आदिवासी समाजातील मुलांना संगणक, मूर्तीकला, मातीची भांडी तयार करण्याचे शिक्षण देणे आणि महिला सबलीकरण आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमातीच्या विकासासाठी करण्यात येत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. श्री.प्रभुणे गेल्या पाच दशकापासून आदिवासी समाजासाठी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुलम् पारधी समाजाच्या ३५० मुलांची देखभाल करत आहे. गुरुकुलम् ला सर्वप्रकारची मदत करण्यात येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे ४१ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे असे सांगितले.

गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम् च्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करुन त्यानुसार गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना जन्मदाखला आणि आधार कार्ड मिळावे यासाठीच्या अडचणी सोडविल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधिश सोनल पाटील, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके, उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांचा प्रातिनिधीक स्वरुपात राज्यपाल महोदयांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी ‘गुरुकुलम्’ ला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

क्रांतितीर्थ’ वाड्याला राज्यपालांची भेट

राज्यपाल रमेश बैस यांनी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या ‘क्रांतितीर्थ’ वाड्याला भेट देऊन उभारण्यात आलेले म्युरल्स, संरक्षित दगडी व लाकडी बांधकाम, ऐतिहासिक वस्तू, छायाचित्रे आदींची माहिती घेतली. येथील मूर्ती पाहून जीवंतपणाचा अनुभव येतो, असे ते म्हणाले.

०००

 

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...