शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 1180

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : केंद्र शासनाची महत्वकांक्षी ‘आयुष्यमान भव’ मोहीम जिल्ह्यात दि.17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान राबविण्यात येणार आहे, याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सेवा रुग्णालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान आपल्या दारी 3.0, आभा कार्ड नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, 18 वर्षावरील पुरुष आरोग्य तपासणी मोहीम, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व प्रा.शाळांमधील तपासणी इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सिपीआर अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव, उपसंचालक डॉ.प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, अधिष्ठाता डॉ.अशोक गुरव व इतर मान्यवर उपस्थित होते.

या अगोदर आयुष्यमान भव या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाईन संपन्न झाला. त्यानंतर राज्य स्तरावरील आयुष्यमान भव मोहिमेचा शुभारंभ मा.राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकमात प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील टीबी चॅम्पीयन, निक्षय मित्र यांचा सन्मान तसेच आभा कार्ड व गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, सर्वसामान्यांना व गोरगरीबांना चांगले आरोग्य मिळावे या हेतूने पंतप्रधान यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ही मोहीम संपुर्ण देशात राबविली जाणार आहे. कोल्हापूर जिल्हयाने आयुष्यमान कार्ड व आभा कार्डचे वाटप येत्या काळात 100 टक्के पुर्ण करून जिल्हयाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. या कालावधीत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवून रक्तदान शिबीर, अवयव दान जनजागृती मोहीम यशस्वी करावी. यावेळी त्यांनी सेवा रूग्णालयाची स्वच्छतेबाबत प्रशंसा करून येथे 100 खाटांचे रूग्णालय येत्या काळात सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

खासदार धनंजय महाडिक यांनी या मोहिमेबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचे आभार मानून आयुष्यमान मोहिमेची प्रशंसा केली. त्यांनी आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानून चांगली सेवा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, कोविड, क्षयरोग यासारख्या आजारांवर अखंड सेवा देत त्यांनी लोकांना सुखरूप घरी सोडले. त्यांचे निरोगी समाज निर्मितीसाठी चांगले योगदान आहे. आयुष्यमान भव ही मोहीम सर्वांनी घराघरात पोहचवावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यांचा केला सन्मान

टीबी चॅम्पियन सन्मान : व्ही डी चौगुले, वैजनाथ पवार, ओमकार पवार, हरी ईश्वरा माळी, बाबासो शंकर पाटील, सोमनाथ करंबळी.

निक्षय मित्र सत्कार : माजी आमदार अमर महाडिक, इंडियन रेड क्रॉस सोसायटी कोल्हापूर, होप फाउंडेशन गडहिंग्लज, अथणी शुगर लिमिटेड, लोटस फाउंडेशन कोल्हापूर.

आभा कार्ड वितरण : पांडुरंग आंबे, पद्मा ढीसाळ, खुशी वळकुंजे, गोपाल खोटरे.

गोल्डन कार्ड : निवास कांबळे, उत्तम नवले, यशवंत पाटील.

000

स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत केंद्र शासनामार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 राबविण्यात येत आहे. या अभियानात जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व शाश्वत स्वच्छतेत सातत्य ठेवल्याबद्दल जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या श्रृंगारवाडी (आजरा), देवकेवाडी (भुदरगड), खेरीवडे (गगनबावडा), माणगांव (हातकणंगले), पिराचीवाडी (कागल), पाटेकरवाडी (करवीर),  राजगोळी खुर्द (चंदगड), हिटणी व नेसरी (गडहिंग्लज), बाजारभोगाव, कोडोली व पोर्ले तर्फ ठाणे (पन्हाळा), येळवण जुगाई (शाहूवाडी), मजरेवाडी व नांदणी (शिरोळ) या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवुन गौरविण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार धनंजय महाडिक यांनी स्वच्छतेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संबंधित सर्व ग्रामपंचायतींचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गौरविण्यात आलेल्या 15 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींची राज्य स्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. श्रृंगारवाडी तालुका आजरा, पिराचीवाडी, तालुका कागल, पाटेकरवाडी, तालुका करवीर. या गावांची निवड राज्य स्तरावर करण्यात आली असुन, या गावांची केंद्र समिती मार्फत पडताळणी पुर्ण करण्यात आली.

000

विभागीय क्रीडा संकुलातील अत्याधुनिक व्यायामशाळेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते भूमिपूजन

येत्या सहा महिन्यात विभागीय क्रीडा संकुलात आवश्यक सुविधा देणार – पालकमंत्री

 

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उपसंचालक क्रीडा कार्यालय व इंडोकाउंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक व्यायामशाळेची निर्मिती केली जाणार आहे. याचे भूमिपूजन जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या व्यायाम शाळेसाठी सीएसआर अंतर्गत इंडोकाउंट फाउंडेशन तर्फे 55 लक्ष रूपये देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपसंचालक माणिक वाघमारे,  आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्वीनी सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, इंडोकाउंट फाउंडेशनचे शैलेश सरनोबत, संदिप कुमार, अमोज पाटील व इतर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पहिल्यांदाच विभागीय क्रीडा परिसराची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले येत्या सहा महिन्यांमध्ये येथील संकुलात असणाऱ्या विविध सोयीसुविधांचा विकास करून येथील चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न करू. जलतरण तलावही येत्या काळात उत्कृष्ट दर्जाचा तयार होईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना दिले. जिल्ह्यातील पारंपारिक खेळ तसेच आत्ताच्या पिढीतील नवे क्रीडा प्रकार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे खेळले जातात या अनुषंगाने उच्च दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी त्या पद्धतीचे सुविधा जिल्ह्यात येत्या काळात तयार होतील.

यावेळी जिल्हा प्रशासनाच्या निधीतून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध व्यायाम प्रकार मार्गदर्शन होण्यासाठी सर्वसामान्यांकरिता फलक लावण्यात येणार आहेत. याचेही उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी विभागीय क्रीडा संकुलात केले.

000

डॉ. नीलम गोऱ्हे  राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तित्व – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि.13 डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जीवन संघर्ष व समाजकार्याची गाथा आहे. आजही पुरुषांचे वर्चस्व असलेल्या राजकारणात त्यांनी आपल्या समाजकार्याने अमीट ठसा उमटवला आहे. त्यांचा जीवनप्रवास  राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांकरिता मार्गदर्शक आणि सदैव प्रेरणादायी राहील, असे उदगार  राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी काढले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘ऐसपैस गप्पा नीलमताईंशी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लेखिका करुणा गोखले व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, भारतीय महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्र यामध्ये नेहमीच कायम आघाडीवर  राहिला आहे. सामान्य कार्यकर्ती ते उपसभापती असा डॉ. नीलम गोऱ्हे यांचा प्रदीर्घ असा जीवन प्रवास आहे. या पुस्तकातून सामाजिक कार्यकर्ती ते राजकीय नेता या प्रवासाची कहाणी शब्दबद्ध करण्यात आली आहे.

देशाच्या प्रगतीसाठी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचे समान योगदान असणे आवश्यक आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 33 टक्के आरक्षण देण्यात आले. आज संसदेत, विधिमंडळ स्थानिक राजकारण यामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढला आहे. महिला विविध क्षेत्रांत आपल्या गुणवत्तेवर पुढे येऊन  आपली कर्तबागारी सिद्ध करत आहेत. ही अभिमानाची बाब आहे.

नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकार्य नव्या पिढीला कळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ग्रामीण,दुर्गम, आदिवासी भागातील महिलासाठी नीलमताईंचे सामजिक कार्य  कायमच सुरू असते. त्यांच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामांचा आणि अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. त्यांचे कार्य, विचार या पुस्तकातून समाजापुढे आले असून नीलमताईंचे राजकारणापलिकडचे समाजकारण या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला कळेल, असे  प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नीलमताई  गोऱ्हे या  ध्येयवादी विचारसरणीच्या  विचारवंत आहेत. समाजासाठी, महिलांसाठी काय करू शकतो यासाठी सतत प्रयत्नशील असतात.नेहमी मदतीसाठी सहानुभूतीची भावना त्यांची असते.

या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच त्यांचा स्वभाव देखील आहे जे मनात असते ते स्पष्ट बोलतात. विधान परिषदेच्या उपसभापती या महत्त्वाचे पदावर काम करत असतानाही विधान परिषदेत सर्वांना न्याय देण्याची व मदतीची त्यांची नेहमीच भूमिका असते. देशात महाराष्ट्र हे  महिला धोरण आणणारे पहिले राज्य आहे. या धोरणात त्यांनी खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत व नवीन तयार होणाऱ्या धोरणाबाबत सातत्याने पाठपुरावा करतात. शिवसेनेच्या इतिहासातली पहिली महिला शिवसेना नेता नीलमताई आहेत. त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. महिला आरक्षण विषय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा यावेळी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाला, सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना वेळ ही खूप महत्त्वाची असते.  वेळ देणे, घेणे आणि ती ठरलेली वेळ पाळणे ही मोठी कसरत असते परंतु लेखिका करुणा गोखले यांनी या पुस्तकांसाठी खुप मेहनत घेऊन वेळेचे नियोजन केले आणि  या पुस्तकाचा प्रवास पूर्ण केला.

कोणतेही कार्य आपण सांगितले नाही तर ते कळणार नाही  सामजिक दायित्व म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकाचा प्रवास आणि अनुभव व्यक्त करून सर्वांचे आभार मानले

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत आणि राज्यगीताने करण्यात आली.

00000

नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :  नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी, आपत्तीपूर्व अंदाज येण्यासाठी शासन नावीन्यपूर्ण संकल्पना राबवीत आहे. कोकणातील सागरी किनारा क्षेत्रात पूर प्रतिबंधक बंधारे बांधणे, दरड कोसळण्यास अटकाव करणे, पूरप्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दरड प्रतिबंधक, धूप प्रतिबंधक कामांबाबत तांत्रिक सादरीकरण करण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव सोनिया  सेठी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘सिग्नेट’चे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, राज्यात विशेषतः कोकण परिसर, डोंगरी भाग आणि प्रमुख नदी परिसरात आपत्तींना अटकाव करणाऱ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागासह आयआयटीमधील तज्ज्ञांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर यासंदर्भात वापरण्यात येणाऱ्या  आधुनिक, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. त्याचा आपल्या राज्यात कसा वापर करता येऊ शकतो, याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

—–*****—–

संध्या गरवारे/विसंअ/

‘वाघ’ हा जैवविविधतेचा मानबिंदू; संवर्धनासाठी निधीची कमतरता नाही – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 13 : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील वाघांची संख्या वाढली आहे. केवळ वाघच नाही, तर इतर वन्यजीव संवर्धनासाठीही राज्य शासन काम करीत आहे. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे प्रतिपादन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्य शासनाचा वन विभाग प्रस्तूत दै. लोकसत्ता प्रकाशित ‘वाघ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाळ रेड्डी, महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ‘मित्र’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर , दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आदींची उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशातील उत्तम व्याघ्रप्रकल्पांपैकी 3 प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत येथील वाघांची संख्या वाढली आहे. वाघ संख्या वाढीच्या वेगात आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे. जगातील 193 देशांपैकी 14 देशांत वाघ आढळतात. त्यापैकी 65 टक्के वाघ हे केवळ महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य शासन, वन विभाग करीत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाघ आणि इतर प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले जात आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वन्यप्राण्यांची शिकार होऊच नये, अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. सर्व प्राण्यांच्या संरक्षणाचे प्रतीक हा वाघ आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे काम वन विभाग करीत आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेने हरित पट्टा क्षेत्रात वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, यावेळी ‘वाघ: अधिवासाचं आव्हान’ या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये प्रधान सचिव श्री. रेड्डी यांच्यासह श्री. टेंभुर्णीकर, श्री. लिमये, श्री. काकोडकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी प्रधान सचिव श्री. रेड्डी म्हणाले की, राज्यात आपण 6 व्याघ्र संवर्धन क्षेत्र घोषित केले आहेत. वाघ ज्याठिकाणी आहे, तेथील कोअर एरिया मधील नागरी वस्ती पुनर्वसनाला आपण प्राधान्य दिले आहे. याशिवाय, वाघ संरक्षणासाठी राज्य व्याघ्र राखीव दल आपण तयार केले. या संवर्धनासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याने त्यांची मदत घेऊन मानव –वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. वाघाला त्याच्या अधिवासामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झाले, तर तो त्या बाहेर येणार नाही. यासाठी तेथील पीक पद्धतीचा विचार करुन काही बदल करण्यात येत आहेत. कृत्रिम बुद्ध‍िमत्ता साधनांचा वापर करुन मानव –वन्यजीव संघर्ष कमी करता येईल का, यासाठी आयआयटी, मुंबई यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. टेंभुर्णीकर यांनी, वाघांचा अधिवास सुरक्षित राहणे महत्वाचे असल्याचे सांगितले. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनीही पर्यावरण आणि वन्यजीवांना नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. जनजागृती आणि शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले. श्री. लिमये आणि श्री. काकोडकर यांनीही स्थानिकांच्या सहकार्याने आणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने हे काम करणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

‘बैल पोळ्या’निमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा

मुंबई दि. 13 : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिला आहे.

राज्यातील बहुतांश भागात व विशेष करून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल, अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर संकट आहे. या काळात राज्य सरकार सर्वार्थाने शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठिशी उभे राहील. शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहून निर्णय घेत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अन्य आवश्यक उपाययोजना देखील करण्यात येतील, असा विश्वास यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

संकट असले तरी पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्याची आपली परंपरा राहिली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, सोबतच शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात, सण-उत्सवात देखील आम्ही सहभागी आहोत, असेही यानिमित्ताने मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

००००

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १३ : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या पुरस्कार स्पर्धेसाठी  १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.१५.०९.२०२३ पर्यंत गणेशोत्सव मंडळानी अर्ज करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

राज्य शासनाने, दिनांक १९ सप्टेंबर  पासून सुरु होणा-या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात येणार आहे. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५.०० लक्ष, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लक्ष व तृतीय क्रमांकास रुपये १.०० लक्ष इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५,०००/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.०४.०७.२०२३ चा शासन निर्णय व दिनांक ३०.०८.२०२३ च्या शासन शुध्दिपत्रकात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमुद केले आहेत.सोबत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर यापूर्वी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते मात्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळानी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण; लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कामकाजाचा ४९ वा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

मुंबई, दि. १३ : लोक आयुक्त न्यायमूर्ती वि. मु. कानडे, यांनी  सन २०२१ मधील लोक आयुक्त व  उप लोक आयुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९ वा वार्षिक एकत्रित अहवाल  राज्यपाल रमेश बैस यांना नुकताच सादर केला.

न्यायमूर्ती श्री. कानडे म्हणाले की, या संस्थेने त्यांच्या सांविधिक स्वातंत्र्याचा पूर्ण वापर करून निःपक्षपातीपणे आणि जलद गतीने नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये सखोल चौकशी केल्यानंतर केलेल्या शिफारशीमध्ये बहुधा विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या जातात, जेणेकरून संबंधित विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षम व निःपक्षपातीपणे करण्यास मदत होते.

राज्य शासनाने किंवा शासनाच्या वतीने किंवा विवक्षित सार्वजनिक प्राधिकारांनी केलेल्या प्रशासकीय कार्यवाहीचे अन्वेषण करण्यासाठी आणि पीडित व्यक्तींकडून अशा कार्यवाहीबाबत आलेल्या गाऱ्हाण्यांवर आणि अभिकथनांवर तोडगा काढण्यासाठी निर्माण केलेल्या या संस्थेकडे सन २०२१ या अहवालाधीन वर्षात ५७६९ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १२५० तक्रारी या केवळ इतर प्राधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या अर्जाच्या प्रती असल्यामुळे किंवा स्वाक्षरी विरहित प्रती असल्यामुळे रीतसर तक्रारी नाहीत, असे समजण्यात येऊन नोंदविण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे अहवालाधीन वर्षात ४,५१९ नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला २०९८ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२१ मध्ये ६,६१७ प्रकरणे कार्यवाहीकरीता उपलब्ध झाली. नोंदणी केलेली ३२०२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२१ च्या वर्षअखेरीस ३,४१५ प्रकरणे प्रलंबित राहिली असल्याचे न्यायमूर्ती श्री. कानडे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील लोकआयुक्त संस्था गेल्या ५ दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर करण्यात यशस्वी ठरली आहे. गेल्या काही वर्षात चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळजवळ ७५ टक्के पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण झाले असल्याचे न्यायमूर्ती श्री. कानडे यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

मुंबई महापालिकेतर्फे ‘खुले भूखंड दत्तक धोरण’ प्रणालीवर चर्चेसाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यात १५ सप्टेंबरला बैठक

मुंबई, दि. १३  : मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी खुले भूखंड दत्तक धोरण (ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी) चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खासगी तत्त्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत्र आणून एकमताने जनहिताचा योग्य निर्णय घेता यावा, या उद्देशाने पालकमंत्री श्री. लोढा यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

“या बैठकीच्या माध्यमातून ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसीबाबत खुली चर्चा व्हावी, नागरिकांनी आपली मते मांडावीत आणि जनहिताचा निर्णय व्हावा एवढाच सरकारचा उद्देश आहे. आमचे सरकार हे लोकसांठी, लोकांमध्ये जाऊन काम करणारे सरकार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या तक्रारी आणि मते मांडायला व्यासपीठ मिळेल याची आम्ही सदैव काळजी घेऊ!” असे पालकमंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले आहे.

***

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून ५ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ...

0
ठाणे,दि.१९ (जिमाका)-: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानांतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात...

अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तत्काळ दखल; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी

0
मुंबई, दि. १९ –अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन...

भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजिना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर दि. 19 : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर...

गरजू रूग्णांसाठी संजीवनी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

0
राज्यातील गरजू व गोरगरीब जनतेला दुर्धर आजारामध्ये उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा जणू संजीवनी ठरला आहे. विदर्भातील गरजू व पात्र रूग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

0
बारामती, दि.१९: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा...